मुंबई (वृत्तसंस्था) देशभरात कोरोना वाढीच प्रमाण एकिकडे उंचावत असतानाच दुसरीकडे त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांच्या जोरावर देशाची या विषाणूशी सुरु असणारी झुंज काही बाबतीत यश मिळवताना दिसतेय. कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे त्याचच एक उदाहरण आहे . दरम्यान, सर्वत्र कोरोनामुळं चिंतेचे वातावरण असतानाच केंद्रान या संसर्गाच्या निरीक्षणासाठी नेमलेल्या समितीनं एक दिलासादायक बाब स्पष्ट केली आहे.
कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असताना हैदराबाद आयआयटीचे प्राध्यापक एम. विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली एका समितीच्या अहवालानुसार सध्या फोफावणारी कोरोनाची लाट फेब्रुवारी महिन्यात उतरणीला लागेल. तोपर्यंत लस विकसित झाल्यास हा संसर्ग बऱ्याच अंशी नियंत्रणातही आलेला असेल. हा एक प्रकारे मोठा दिलासा असला तरीही योग्य काळजी न घेतल्यास कोरोना रुग्णांची संख्या तोवर १.६ कोटींच्या घरात पोहोचू शकते. सणासुदीच्या दिवसांची पार्श्वभूमी पाहता रुग्णसंख्येत तब्बल २६ लाखांनी वाढ होण्याचा संभाव्य धोक्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
सदर समितीचा हा अहवाल पाहता, नवरात्र, दसरा, दिवाळी आणि त्यानंतर येणाऱ्या नाताळसणाच्या दिवसांमध्ये कोरोनाबाबत अधिक सावधगिरी पाळली जाणं गरजेचं असेल हेच स्पष्ट होत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करत, मास्क आणि सॅनिटायझरचाही वापर करण्याचाच सल्ला सर्व अभ्यासकांकडूनही देण्यात येत आहे.