जळगाव (प्रतिनिधी) मागील काळात ओबीसी नेत्यांना भाजपा ने नेहमीच सहकार्य केल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र गेल्या चारपाच वर्षांचा विचार केला तर भाजपचे काही नेते ओबीसी नेत्यांना टार्गेट करीत असल्याचं पाहायला मिळत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी केला आहे. तसेच भाजपमध्ये सर्वांत जास्त छळ गोपीनाथ मुंडे यांचा करण्यात आला, असाही आरोप त्यांनी केला.
पूर्वाश्रमीचं भाजपचं राज्यातील सर्वात मोठं नाव आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवलाय. यावेळी बोलताना खडसे यांनी म्हटलं आहे की, भाजपमध्ये सर्वांत जास्त छळ गोपीनाथ मुंडे यांचा करण्यात आला, असा आरोपही खडसे यांनी केला आहे. गेल्या ४-५ वर्षांचा विचार केला तर भाजपचे काही नेते ओबीसी नेत्यांना टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळत आहे, असं खडसे यांनी म्हटलं आहे. जळगावमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हे वक्तव्यं केलं.
खडसे म्हणाले की, सध्याची परिस्थिती हालाखीची आहे या परिस्थिती मध्ये कोणीही राजकारण करू नये, अशी भूमिका नितीन गडकरी यांनी मांडली आहे आणि अशाच प्रकारची भूमिका आपण मागच्या महिन्यात मांडली होती. त्यामुळे विरोधक असो वा सत्ताधारी यांनी मतभेद विसरून एकत्र येऊन कोरोनाची लढाई लढली पाहिजे. केवळ टीकाटिपण्णी करून यंत्रणा ही नाउमेद होत असते. त्यामुळे असं होता कामा नये, असं गडकरी यांनी म्हटलं आहे आणि आपण त्यांच्या मताशी सहमत असल्याची प्रतिक्रिया एकनाथराव खडसे यांनी दिली.
खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली. गिरीश महाजन यांचा सर्व इतिहास आपल्याला माहिती असून त्यांना राजकारणात मी आणलं, असंही खडसे यांनी म्हटलं आहे.