जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा वाढला आहे. शनिवारी जळगाव व भुसावळचे तापमान ४५.५ अंश असल्याची नोंद करण्यात आली आहे. आज देखील तेवढेच तापमान आहे.
आठवडाभरापासून सुर्य अधिक तापत असून आता जणू काही आगच ओकू लागला आहे. यामुळे वैशाखाचा वणवा आता पेटू लागल्याचा भास होत आहे. जळगाव शहराचे शनिवारचे तापमान ४४ अंशावर होते. आज त्यात दीड अंशानी वाढ झाली. सकाळी दहापासूनच उन्हाचे असह्य चटके बसत होते. उन्हाच्या असह्य झळांनी नागरिकांची चांगलीच होरपळ होताना दिसली.
जळगावात शनिवारचा बाजार असतो. यामुळे मार्केट परिसर, व्यापारी संकुलात वर्दळ असते. परंतु, उन्हामुळे वर्दळ नव्हती. रस्तावरील वाहतूक तुरळक सुरूच होती. मुख्य म्हणजे कायम रहदारी असलेल्या महामार्गावर देखील दुपारी शुकशुकाट पहायला मिळाला. मोठ्या वृक्षांजवळ दुचाकीधारक सावलीत गप्पा करीत होते. तर अनेकजण उन्हाची तिव्रता कमी झाल्यानंतर बाहेर पडलेले पाहण्यास मिळाले.