मुंबई (वृत्तसंस्था) देहूमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेसने यावरुन भाजपवर तुफान टीका केली होती. खासदार सुप्रिया सुळेंनी यावरुन आंदोलन देखील केलं होतं. ‘अजितदादा आणि पंतप्रधान हे इतक्या चांगल्या मनमोकळेपणे बोलत होते. पण मला तर असं वाटतं की, कदाचित हे अजितदादांच्या विरोधातच षडयंत्र आहे.’ असं फडणवीस यावेळी म्हणाले.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या श्री क्षेत्र देहू येथील शिळा मंदिराचे लोकार्पण मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमानंतर नव्या वादाला तोंड फुटल्याचे दिसून आले. या कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण झाले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषणाची संधी का देण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा उपस्थित करत, यावरून टीका देखील केली. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत पत्रकारपरिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं दिसत आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंतप्रधानांनी अजित पवारांची विचारपूस केली. एवढच नाही तर अजित पवारांचं नाव नाही असं लक्षात आल्यावर, पंतप्रधानांनी स्वत: ‘अरे अजित पवार बोलणार नाहीत का? अजित पवार तुम्ही बोला’, असं म्हटलं. त्यानंतर अजित पवारांनी सांगितलं की, नाही आपणच बोला. हे सगळं काही लोकांना पाहावत नाही, त्यामुळे इतका चांगला कार्यक्रम झाल्यानंतर जाणीवपूर्वक अशाप्रकारे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतोय. मला तर असं वाटतय की कदाचित अजित पवारांच्या विरोधातच हे षडयंत्र आहे.”
तसेच “मी माझा कयास व्यक्त केला आहे. राजकारणात आपल्याला प्रत्येक गोष्टी मागील अर्थ समजतो. एक आकलन असतं, त्याच्या आधारावर हे अंदाज असतात. त्यामुळे मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगितलं. त्यात सत्य काय आहे?, कोणामुळे होतय?, काय आहे? हे शोधून काढणं काम तुमचं आहे ते माझं नाही.” असं देखील फडणवीसांनी पुढे बोलून दाखवलं.