नाशिक (वृत्तसंस्था) सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील काही नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे. मी इथेच नाशिक मध्ये आहे, रात्री कोणाला अटक झाली तर प्रतिक्रिया द्यावी लागेल, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. दरम्यान, नेमक्या कोणत्या नेत्याला अटक होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या नाशिकमध्ये आहेत. भाजपची संघटनात्मक बैठक व पक्षकार्याचा आढावा घेण्यासाठी पाटील यांचे शुक्रवारी रात्री उशिरा शहरात आगमन झाले. तेव्हा पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर मतप्रदर्शन केले. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचे बँक खाते गोठविण्यात आल्याबद्दल त्यांना विचारणा केली असता, केवळ मुंडेच नव्हे तर अनियमित कारभार करणाऱ्या राज्यातील ९० टक्के कारखान्यांवर कारवाई होत असल्याचे पाटील यांनी सांगितले. पंकजाताई नव्हे, तर त्यांचे कार्यकर्ते नाराज असून, कारखान्याला बजावण्यात आलेली नोटीस आणि नाराजीचा संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला.
ईडी स्वायत्त संस्था आहे. ती केंद्राच्या अखत्यारित काम करते. त्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही. मात्र, रात्रीतून कोणालाही अटक होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला सकाळी पुन्हा माझ्याकडे प्रतिक्रियेसाठी यावे लागू शकते, असे पाटील यांनी जाता जाता पत्रकारांना मिश्कीलपणे सांगितले. त्यामुळे नेमक्या कोणत्या नेत्याला अटक होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पाटील यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे.