एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील जवखेडेसीम येथे हिंस्त्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात पाच जनावरे ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. जवखेडेसिम येथील शेतकरी संजय कैलास पाटील यांच्या मालकीची ही जनावरे होती. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या संदर्भात अधिक असे की, संजय पाटील यांची गावालगत शेतीत बैल जोडी, गायी , वासरे यांच्यासह १० ते १२ पाळीव जनावरे आहेत. पाटील हे मंगळवारी सकाळी गायीचे दूध काढण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी लागलीच शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांना माहिती कळवली. तर वासुदेव पाटील यांनी वनविभागाला कळवले. वनरक्षक विजय माळी, वनमजूर रविंद्र पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत नागने ( आडगाव ) यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शेतकरी पाटील यांचे लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.