नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत २९ हजार ६१६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २९० कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
गेल्या २४ तासांच्या आकडेवारीनुसार, देशात २९ हजार ६१६ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. शुक्रवारी हाच आकडा ३१ हजार ३८२ इतका होता. त्यामुळे नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट गेल्या २४ तासंमध्ये दिसून आली आहे. दरम्यान, आत्तापर्यंत देशात ३ कोटी २८ लाख ७६ हजार ३१९ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आजघडीला देशात ३ लाख १ हजार ४४२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे देशात सरासरी रिकव्हरी रेट हा ९७.७८ टक्के इतका झाला आहे. गुरुवारी देशात ३१८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. हाच आकडा आज २९० पर्यंत खाली आला आहे. आत्तापर्यंत देशभरात ४ लाख ४६ हजार ६५८ कोरोना रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे.
दरम्यान, देशातील लसीकरणाने आता वेग पकडायला सुरुवात केली आहे. शुक्रवारी दिवसभरात एकूण ७१ कोटी ४ लाख ०५१ लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत देण्यात आलेल्या डोसची संख्या ८४ कोटी ८९ लाख २९ हजार १६० इतकी झाली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात शुक्रवारी ३,२८६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार ९३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ५७ हजार ०१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२३ टक्के आहे. राज्यात आज ५१ कोरोना बाधितांचे मृत्यू झाले असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.