नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत २ हजारांनी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ३८ हजार ७९२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ६२४ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाची लाट सौम्य होताना दिसत आहे. दिवसेंदिवस बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून नवबाधितांची संख्या घटत आहे. देशात काल दिवसभरात ३८ हजार ७९२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख २९ हजार ९४६ वर पोहोचली आहे. तर काल ४१ हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आता बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या तीन कोटी १ लाख ४ हजार ७२० वर पोहोचली आहे. देशातला कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर मात्र स्थिर आहे. आजही हा दर ९७.२८ टक्के इतका आहे. तर देशात काल दिवसभरात ६२४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत मृत्यू पावलेल्या करोनारुग्णांची संख्या ४ लाख ११ हजार ४०८ वर पोहोचली आहे. तर देशाचा कोरोना मृत्यूदर आता १.३३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
देशातली कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमही वेगात सुरु आहे. देशात काल दिवसभरात ३७ लाख १४ हजार ४४१ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यापैकी २३ लाख ११ हजार ५०२ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून १४ लाख २ हजार ९३९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे देशातल्या लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या आता ३८ कोटी ७६ लाख ९७ हजार ९३५ वर पोहोचली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात काल (मंगळवारी) ७ हजार २४३ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १० हजार ९७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ५९ लाख ३८ हजार ७३४ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२१ टक्के झाले आहे. राज्यात काल (मंगळवारी) १९६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.