टोकयो (वृत्तसंस्था) टोकयो पॅरालिम्पिक स्पर्धेत कृष्णा नागरनं भारताला पाचवे गोल्ड मेडल जिंकून दिले आहे. त्यानं बॅडमिंटन स्पर्धेतील एसएल ६ क्लास फायनलमध्ये हाँगकाँगच्या शू मान कायशीचा २१-१७, १६-२१, २१-१७ असा पराभव केला. यासोबत भारताच्या पदकसंख्येने १९ हा विक्रमी आकडा गाठला आहे. कृष्णा नागरच्या विजयासोबतच भारताच्या खात्यात ५ सुवर्णपदकं, ८ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश झाला आहे.
कृष्णा नागरने हाँगकाँगच्या शू मान कायशीचा परभव करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. याआधी विश्वविजेत्या प्रमोद भगतने शनिवारी पॅरालिम्पिकमधील पुरुष एकेरी बॅडमिंटन एसएल६ क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली. तर मनोज सरकारने कांस्यपदक जिंकत हा आनंद द्विगुणित केला होता. यंदा पॅरालिम्पिकमध्ये प्रथमच बॅडमिंटनचा समावेश करण्यात आला आहे.
याआधी सुहास यशिराजने समारोपाच्या दिवशी रौप्यपदक जिंकलं. सुहासला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती. मात्र पराभव झाल्यामुळे रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं. सुहास यथिराज आयएएस अधिकारी असून टोकयो पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला आहे. सुहास यथिराज पदक जिंकणारा पहिला आयएएस अधिकारी ठरला आहे. अंतिम सामन्यात सुहास यशिराजसमोर फ्रान्सच्या अग्रमानांकित ल्युकास मझूरचं आव्हान होतं. याआधी सुहासने उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या फ्रेडी सेटियावानवर २१-९, २१-१५ अशा ३१ मिनिटांमध्ये विजय मिळवला होता.
भारताची सर्वोत्तम कामगिरी
टोकयो पॅरालिम्पिक २०२०मध्ये भारताकडे आता एकूण १९ पदके आहेत. पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. रविवारी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारताने आतापर्यंत पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्यपदके जिंकली आहेत. त्याचबरोबर भारत गुणतालिकेत २६ व्या स्थानावर आहे.