लातूर (वृत्तसंस्था) विजेच्या धक्क्याने एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रेणापूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरमध्ये रविवारी (दि. २६) सायंकाळच्या सुमारास घडली.
साठे नगर परिसरात रविवारी (दि.२६) सायंकाळी नगरपंचायतीच्या नळाला पाणी आले होते. ते पाणी भरण्यासाठी किरण तुकाराम कांबळे (वय ३०) या तरुणाने नळाला विद्युत मोटार लावली. त्यासाठी वायर लावत असताना विजेचा जब्बर धक्का बसला. यात तो जमिनीवर कोसळला. या घटनेची वार्ता मिळताच कुटुंबातील मंडळीसह गल्लीतील नागरिकांनी त्यास रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. कुटुंबातील कर्ता व्यक्तीचा अस्कमात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयत किरण कांबळे याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, तीन मुले असा परिवार आहे. सोमवारी (दि.२७) सकाळी मयत तरुणावर अत्यंस्कार करण्यात आले.