बोदवड (प्रतिनिधी) मानसिक संतुलन बिघडल्याने घरातून निघून गेलेल्या इरफान उर्फ डब्बू याची आज आत्मसन्मान फाऊंडेशनच्या माध्यमातून कुटुंबियांशी भेट झाली. मूळचे उत्तर प्रदेश येथील राहणारे अन्सारी कुटुंब सुरत येथील लिंबायत सुरत येथे कामा निमित्ताने स्थायिक झाले आहेत.
अडीच तीन वर्षांपूर्वी छोट्याशा अपघातामुळे डोक्यास झालेल्या दुखापतीमुळे इरफान उर्फ डब्बू याचे मानसिक संतुलन बिघडले. त्यावर कुटुंबीयांनी उपचारसुद्धा सुरू केले होते. मात्र दोन वर्षांपूर्वी घरच्यांच्या नकळत इरफान घरून गेला. अशा विमनस्क अवस्थेत दहा महिन्यांपूर्वी तो बोदवड येथे आत्मसन्मान फाउंडेशनच्या सदस्यांना दिसला. त्यांनी त्यास फाउंडेशनच्या मनोरुग्ण सहाय्यता केंद्रात नेले. त्याची विचारपूस केली असता तो फक्त त्याचे नाव डब्बू असे सांगत असे. त्याच्यावर औषधोपचार सुरू केले असता त्याच्यात हळू हळू थोडी सुधारणा होत गेली. दोन दिवसांपूर्वी केंद्रातील मदतनीसांशी बोलतांना त्याने अचानक त्याला आठवलेला एक मोबाईल नंबर सांगितला. त्या नंबरवर संपर्क करत डब्बूचे फोटो पाठवले असता, त्याचे नाव इरफान अन्सारी असे असून मी त्याचा भाऊ बोलत आहे, असे समोरील व्यक्तीने सांगितले. त्यानंतर व्हिडीओ कॉलवर इरफान कुटुंबियांशी बोलला. त्याचे भाऊ यांनी आम्ही त्यास घ्यायला लगेच येतो, असे सांगितले. त्यानुसार आज इरफानचे भाऊ नसीम अहमद अन्सारी व त्याचे मामा आणि एक त्याचा मित्र त्याला घ्यावयास आले. आपल्या भावास सुरक्षित व चांगल्या अवस्थेत पाहून त्यांचे डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले की, इरफान आम्हास कधी भेटेल याची आम्ही आशा सोडून दिली होती. परंतू तुमच्यामुळे आमचा भाऊ आम्हाला भेटला. या संस्थेचे आभार मानावे तितके कमी पडतील, अश्या भावना व्यक्त करत त्यांनी अन्सारी कुटुंबामार्फत आत्मसन्मान फाउंडेशनचे मनापासुन आभार मानले. आज दुपारी इरफानला आत्मसन्मान फाउंडेशनच्या मनोरुग्ण सहाय्यता केंद्रामार्फत निरोप देण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विजय पाटील, मार्गदर्शक महेंद्र पाटील ,वृक्षमित्र संजय वराडे, पुरुषोत्तम पाटील, केंद्रातील रुग्णांची काळजी घेणारे शुभम वाशिमकर, ऋषिकेश शर्मा उपस्थित होते.