नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) वरील व्याजदर ८.१ टक्क्यांपर्यंत आणल्याबद्दल निशाणा साधला. लोक कल्याण मार्ग पत्ता (पंतप्रधान निवास) ठेवून लोकांचे कल्याण होत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांची खिल्ली उडवत राहुल गांधी यांनी याबाबत ट्विट केले आहे. “घराचा पत्ता ‘लोक कल्याण मार्ग’ ठेवल्याने लोकांचे भले होत नाही. साडेसहा कोटी कर्मचाऱ्यांचे वर्तमान आणि भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी पंतप्रधानांनी ‘महागाई वाढवा, कमाई कमी करा’ हे मॉडेल लागू केले आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी एक आलेख देखील शेअर केला, जो २०१५-१६ मध्ये ईपीएफ वर ८.८ टक्के व्याजदर होता, जो आता ८.१ टक्क्यांवर आला आहे.
चालू वर्षांच्या सुरुवातीला, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या पीएफ अंशदानावर २०२१-२२ साठी व्याजाचा दर ८.१ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर त्यावेळी बरीच टीकाही झाली होती. मात्र तरी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे संमतीसाठी पाठवला. त्याला मंजुरी देताना प्रत्येक ईपीएफ खात्यात २०२१-२२ साठी ८.१ टक्के व्याजदर जमा करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याचे शुक्रवारी ईपीएफओ कार्यालयाने आदेशाद्वारे स्पष्ट केले. केंद्र सरकारने व्याजदराला मान्यता दिल्यानंतर, सरलेल्या २०२१-२२ आर्थिक वर्षांसाठी ८.१ टक्के दराने व्याजदर ईपीएफ खात्यांमध्ये जमा करण्यास कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून सुरुवात केली जाईल.