जळगाव ( प्रतिनिधी ) – माहेरून ५ लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी एका ३३ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घराबाहेर काढल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजश्री किशोर नेरकर (वय ३३, रा. सदगुरुनगर, कुसुंबा, ता. जि. जळगाव) यांचा विवाह किशोर नेरकर यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळानंतर सासरच्या मंडळींनी राजश्री यांच्याकडे माहेरून ५ लाख रुपये घेऊन येण्यासाठी तगादा लावला. ही मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून पती किशोर नेरकर, सासरे चंद्रकांत दोधा नेरकर, सासू अहिल्याबाई नेरकर, जेठ नितीन नेरकर आणि जेठाणी शारदा नेरकर यांनी त्यांना वारंवार शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली.आणि घराबाहेर काढून देण्यात आले. केवळ पैशांची मागणी पूर्ण झाली नाही म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. इतकेच नव्हे तर, ती सध्या राहत असलेल्या ठिकाणी येऊनही तिला शिवीगाळ व धमक्या देण्यात आल्याचे तिने सांगितले. अखेर या त्रासाला कंटाळून राजश्री नेरकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफूर तडवी हे करीत आहे.















