धरणगाव (प्रतिनिधी) महात्मा जोतिराव फुले यांना महाराष्ट्रातील दुसरे समाजसुधारक रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे व रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने ११ मे १८८८ रोजी “महात्मा” ही पदवी प्रदान केली होती. त्यावेळेपासून देश त्यांना महात्मा म्हणून ओळखू लागला आहे. त्यामुळे हा दिवस राज्य सरकारने ‘महात्मा दिन’ या नावाने साजरा करण्याची मागणी श्री संत सावता माळी युवक संघाचे अध्यक्ष सचिन गुलदगड यांच्या आदेशानुसार विभागीय संघटक विनायक महाजन यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
महात्मा फुले यांचे कार्य जगाला सर्वश्रुतच आहे. स्त्री-शुद्र-अतीशुद्र समाजाच्या उन्नतीसाठी सावित्रीबाई फुले व जोतीबा फुले ज्या तन्मयतेने झटत होते. त्यासाठी त्यांनी जे कष्ट उपसले होते. मांडवीच्या रघुनाथ सभागृहात आपल्या उद्धारकर्त्या महामानवाचे ऋण फेडण्यासाठी गरीब व कष्टकरी जनतेने मोठ्या संख्येने आणि उत्स्फुर्तपणे जमून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विडा उचलला होता. मुंबईकर सत्यशोधक कार्यकर्ते व नारायण मेघाजी लोखंडे यांच्या आमंत्रणांवरुन जोतीबा फुले मुंबईला आले होते. तेव्हा मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेच्या वतीने ११ मे १८८८ रोजी जोतीबा फुलेंना युगप्रवर्तक कार्याबद्दल ‘महात्मा’ पदवीने गौरविण्यात आले. त्यादिवसापासून सर्वांना जोतीबा फुले ‘महात्मा फुले’ नावाने परिचित झालेत.
११ मे २०२३ रोजी त्या घटनेस १३५ वर्षे पुर्ण होत आहेत. या घटनेचा वेध घेऊन श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्य या संघटनेने देशभर सलग ८ वर्ष विविध उपक्रम घेऊन हा विशेष दिन साजरा केला. तसेच या दिवसास ‘महात्मा दिन’ असे नाव दिले. महात्मा फुले नावाने प्रसिद्ध व परिचित असलेले जोतीराव ऊर्फ जोतीबा गोविंदराव फुले हे मराठी लेखक,विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना ११ मे इ.स.१८८८ या साली मिळाली,त्यामुळेच ११ मे या दिवसाला महत्व प्राप्त झाले असुन ११ मे रोजी ‘महात्मा दिन’ म्हणुन साजरा करण्यात यावा,असे आवाहन विभागीय संघटक विनायक महाजन यांनी श्री संत सावता माळी युवक संघाच्या पदाधिकार्यांना व समस्त फुलेप्रेमींना केले आहे. आगामी ११ मे रोजी या मागणीसाठी राज्यशासन,जिल्हाधिकारी,तहसीलदार,आदी पातळीवर निवेदने देऊन सरकारला हा ‘महात्मा दिन’ साजरा करण्यासाठी दबाव तयार करावा लागेल. त्यांच्या कार्याला ती आदरांजली ठरेल, असेही संघटनेचे विभागीय संघटक विनायक महाजन यांनी म्हटले आहे.














