मुंबई (वृत्तसंस्था) १०० कोटी वसुली प्रकरणात सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. तसेच, त्यांच्यावर बदली घोटाळ्याचाही आरोप आहे. त्याप्रकरणी सीबीआयने मुंबईचे आयुक्त संजय पांडे यांचा जबाब नोंदवला आहे. तब्बल सहा तास सीबीआयने संजय पांडे यांची चौकशी करुन त्यांचा जबाब नोंदवला
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडे यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात माजी आयुक्त परमबीर सिंह यांना फोन करुन देशमुखांविरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी प्रभाव टाकण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची गृहरक्षक विभागात बदली झाली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या वर्षी मार्चमध्ये अनिल देशमुख यांच्या विरोधात पत्र लिहिले होते, ज्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून परमबीर सिंह यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे.
त्यानंतर, परमबीर सिंह यांनी आपल्याविरुद्धचा तपास मागे घेण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याशिवाय त्यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे, जे सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत, यांचे संभाषण उघड केले होते. ज्यामध्ये कथितपणे संजय पांडे यांनी परमबीर सिंह यांना फोन करून त्यांचे पत्र मागे घेण्यास सांगितले आणि जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्याविरुद्ध आणखी गुन्हे दाखल केले जातील, असे म्हटले.
सीबीआयने त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले होते की, संजय पांडे आणि परमबीर सिंह यांच्यात झालेल्या संभाषणातून महाराष्ट्र सरकार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय यंत्रणांच्या तपासापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. केंद्रीय यंत्रणांमार्फत सुरू असलेला तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) वर्ग करावा, अशी विनंती करणारी याचिका महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात दाखल केली असता सीबीआयने हे उत्तर दिले होते.