मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन मोठा गदारोळ उडाला होता. वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडोली यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. भावाच्या लग्नाचे कारण समोर करुन कंगनाने चौकशीला हजर राहण्यास मुदतवाढ मागितली होती. आता मुंबई पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांना तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे. या वेळी ती चौकशीला हजर राहणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले होते. धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप कंगनावर लावण्यात आला असून त्यामुळेच तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कंगना रनौतला याआधी जेव्हा समन्स पाठवण्यात आलं होतं. तेव्हा तिने आपल्या भावाचं लग्न असल्यामुळे चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नसल्याचं सांगितलं होतं. पेशाने वकील आणि तक्रारदार महोम्मद साहिल अशरफ अली सय्यद यांनी गेल्या महिन्यात मुंबई वांद्रे कोर्टात रंगोली आमि कंगनाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. महोम्मद साहिल अशरफ अली सय्यद यांनी सेक्शन 121, 121A, 124A,153A ,153B, 295A, 298 आणि 505 अंतर्गत कंगनाविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती.
कंगनावर गुन्हा दाखल दाखल करण्याची मागणी करणाऱ्या व्यक्तीने कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगना रनौतचे सर्व ट्वीट्स आणि व्हिडीओ सादर केले होते. त्यानंतर कोर्टाने कलम 156 (3) अंतर्गत कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. एफआयआर दाखल केल्यानंतर कंगनाची चौकशी होणार आणि जर कंगना विरोधात पुरावे मिळाले तर मात्र कंगनाला अटकही केली जाण्याची शक्यता आहे.