जळगाव (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यात एनसीबीच्या पथकाने मोठ्या प्रमाणात गांजा पकडल्यानंतर एरंडोल तालुक्यातील वनकुठेगाव प्रचंड चर्चेत आले होते. याच गावातील नंदू बेलदार नामक तरुणाला अमळनेर पोलिसांनी एका एनडीपीएसच्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात पकडलेल्या गांजाचे धागेदोरे वनकोठे येथे पोहोचली होती.
चित्तोडगडच्या निम्बाहेडा पोलिस ठाण्यात गांजा तस्करी प्रकरणी दाखल गुन्ह्यात वनकोठ्याचा जयसिंग ऊर्फ रामसिंग बेलदार हा संशयित असून त्याचा शोध घेण्यासाठी राजस्थान पोलिस धडकले होते. परंतु, जयसिंग मिळून न आल्यामुळे पथक परतले होते. तर दुसरीकडर मुंबई एनसीबीच्या पथकाने नांदेड जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा गांजा पकडल्यानंतर तपासाची पाळेमुळे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वनकोठे या छोट्याशा गावात येऊन पोहोचली होती.
ऑगस्ट २०२१ मध्ये राजस्थानातील चित्तोडगड जिल्ह्याच्या निम्बाहेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजाची तस्करी होत असल्याची माहिती तेथील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तीन जणांना अटक केली. यातील गणेश चौधरी व अनिल सोनवणे (दोघांची पूर्ण नावे माहीत नाही) हे दोघे जळगावातील रहिवासी आहेत तर शंकरदास बैरागी हा भिलवाडा येथे राहतो. या तिघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सुमारे तीन लाख रुपये किमतीचा २६ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. या गुन्ह्यात तिघांना अटक केल्यानंतर त्यांचे गांजा तस्करीचे मोठे रॅकेट असून आणखी काही लोक सहभागी असल्याचा संशय आहे. त्यानुसार अटकेतील गणेश चौधरी याचे कॉल डिटेल तपासले असता त्यात घटनेच्या दिवशी त्याचे जयसिंग सोबत सर्वाधिकवेळा बोलणे झाल्याचे समोर आले.
तसेच जयसिंग हा देखील आपला साथीदार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार उपनिरीक्षक गोपालनाथ यांच्यासह दोन कर्मचारी शुक्रवारी वनकोठ्यात आले. त्यांनी कासोदा पोलिस ठाण्यात नोंद करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने वनकोठ्यात जाऊन जयसिंगच्या घरी तपासणी केली. परंतु, जयसिंग मिळून आला नाही. त्यामुळे शनिवारी हे पथक परत गेले. गणेश चौधरी, अनिल चौधरी व शंकरदास बैरागी हे तिघे राजस्थानात न्यायालयीन कोठडीत बंदी आहेत.
दरम्यान, नांदेड गांजाच्या प्रकरणात एनसीबीच्या पथकाने नंदलाल ऊर्फ नंदू रतन बेलदार याची चौकशी केली होती. तर राजस्थान पोलिस असलेला जयसिंग हा नंदूचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली काही दिवसांपूर्वी आली होती.
तर दुसरीकडे अमळनेर येथे साधारण दीड वर्षांपूर्वी दाखल गुन्ह्यात नंदू बेलदार याला अमळनेर पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदू बेलदार याला अमळनेर येथे आणण्यात येत आहे. अमळनेर अपील दाखल गुन्ह्यात नंदू बीलदारचे नाव पुरवणी दोषारोपपत्रात आले होते. तर नांदेड येथील गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेल्या ड्रायव्हर जवळील मोबाईल नंबरमध्ये जळगावच्या एका व्यक्तीचा मोबाईल नंबर होता आणि ते दोघे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे देखील समोर आले होते. दरम्यान नंदू बेलदारला ताब्यात घेण्यात आल्यामुळे नांदेडच्या गुन्ह्यात मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नंदू बेलदार याला ताब्यात घेण्यात आले आहे. – डॉ.प्रवीण मुंढे
नंदू बेलदारला ताब्यात घेऊन अमळनेरला येत आहोत. सध्या प्रवासात आहोत. – जयपाल हिरे पोलीस निरीक्षक, अमळनेर
















