जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांना भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणात ईडी (सक्तवसुली संचालनालय)ने समन्स बजावले आहे. त्यांना येत्या ३० डिसेंबर राेजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. भाजपकडून सूडाचे राजकारण केले जात असून, खडसेंना आलेली ईडीची नोटीस हा त्यातलाच एक भाग आहे, असा आरोप करत जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी पक्ष कार्यालयात केंद्र सरकारच्या विरोधात निर्देशने केली.
भोसरी इथं भूखंड खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना महसूल मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर चार वर्ष खडसे यांना मंत्रिपदापासून दूर राहावे लागले. याच प्रकरणी आता खडसे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. मात्र, हा सर्व प्रकार सुडाच्या राजकारणासाठी भाजपकडून सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
एकनाथ खडसे यापूर्वी भाजपमध्ये होते. त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी ईडी लावली तर सीडी लावणार असल्याचे वक्तव्य केले होते. भोसरी भूखंड प्रकरणी याआधीही चार वेळा आपली चौकशी झाली आहे. आता ED पाचव्यांदा चौकशी करणार आहे. ED ला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं खडसेंनी सांगितलं. भोसरीतील एमआयडीसीतील भूखंडाच्या व्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने एकनाथ खडसे यांना चौकशीची नोटीस बजावली आहे. ३० डिसेंबर रोजी त्यांना मुंबईतील कार्यालयात चौकशीकामी उपस्थित रहावे लागणार आहे. ही बाब स्वतः खडसेंनी काल (शनिवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितली.
यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात एकत्र येत भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, वाल्मीक पाटील, प्रदीप भोळे, अजय बढे आदी उपस्थित होते. यावेळी भाजप व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘ईडी झाली येडी’, ‘भाजप सरकारचा निषेध असो’, अशा घोषणा देत जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील म्हणाले की, भाजपकडून सुडाचे राजकारण केले जात आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जात आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम भाजप करत असून, हे खपवून घेणार नाही. भोसरीतील भूखंडाच्या व्यवहाराची यापूर्वी एसीबी, अँटी करप्शन तसेच झोटिंग समितीने सखोल चौकशी करून खडसेंना क्लीनचिट दिली आहे, असे असताना आता पुन्हा या प्रकरणाची चौकशी करणे योग्य नाही. ईडीने खडसेंना काढलेली नोटीस त्वरित मागे घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अभिषेक पाटील यांनी दिला.