जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांनी वारंवार तक्रारी केल्यामुळे राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना राजीनामा द्यायला सांगितला गेला होता. त्यामुळे मला कार्यमुक्त करा किंवा आम्ही सामुहिक राजीनामे देऊ, असे प्रकार म्हणजे एकप्रकारे हा पक्षश्रेष्टींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्याच दुसऱ्या गोटातून आता समोर येत आहे. दुसरीकडे ऑगस्ट महिन्यात राष्ट्रवादी महानगरची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती, हे विशेष !
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत कुरबुरींनंतर जयंत पाटील यांनी अभिषेक पाटील यांना महानगराध्यक्ष पदावरून दूर केले होते. अभिषेक पाटील यांच्याबाबत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींवरून त्यांची महानगराध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे नाराज झालेल्या अभिषेक पाटील यांनी पक्षश्रेष्ठींवर दबावतंत्राचा वापर सुरु केला असल्याचेही बोलले जात आहे. अभिषेक पाटील यांनी प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र पाठवत कार्यमुक्त करण्याची मागणी केल्यामुळे ते उलट पक्षालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताय का?, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. खरं म्हणजे यानिमित्ताने राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जिल्ह्यातील नेत्यांची एक महत्वाची बैठक झाली होती. यावेळी उपस्थित अनेक नेत्यांनी अभिषेक पाटील यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नव्हे तर, खडसे गटाचे अशोक लाडवंजारी यांना महानगराध्यक्ष पद देण्याची शिफारस देखील करण्यात आली होती. या बैठकीनंतरच जळगाव महानगराध्यक्ष पदावरून अभिषेक पाटील यांची उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतू अनेक दिवस यावर निर्णय होऊ शकला नव्हता. त्यानंतर गुरुवारी रात्री अचानक राष्ट्रवादीतील घडामोडी वेगाने फिरायला सुरुवात झाली.
जळगाव महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची आढावा बैठक २८ ऑगस्टला महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, एजाज मलिक तसेच प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली होती. यावेळी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेली जळगाव महानगरची कार्यकारणी पुर्णपणे बरखास्त करण्यात आली होती. तसेच नवीन कार्यकारणीची घोषणा येत्या काही दिवसात करण्यात येणार होती. परंतू तत्पूर्वीच आता अभिषेक पाटील यांचा राजीनामा झाल्यामुळे आता नवीन महानगराध्यक्ष नियुक्त झाल्यानंतरच नवीन कार्यकारणी जाहीर होईल,हे स्पष्ट झाले आहे.
‘मला आता स्वतः; पक्षाचे तळागाळात काम करावयाचे आहे. स्थानिक नेत्यांच्या वारंवार तक्रारीमुळे मी पूर्ण क्षमतेने काम करू शकत नव्हतो. तरी मला वरील संघटनेच्या पदावरून मुक्त करावे. मी सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षात इमाने इतबारे काम करेन,’ असा मजकूर असलेले अभिषेक पाटील यांचे पत्र सोशल मीडियावर पत्र व्हायरल झाले होते. पक्षाअंतर्गत कलहाचा विषय सार्वजनिक झाल्यामुळे पक्षश्रेष्ठी देखील नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. कारण राष्ट्रवादीला अंतर्गत कलह काही नवीन नाही. विनोद देशमुख यांच्या सारख्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याला तर पक्षाने निलंबित केले होते. परंतू त्यांनी कधीही सोशल मीडियातून त्रागा व्यक्त केला नाही. एवढेच काय पक्षातील अनेक नेत्यांना याआधी पक्षाचे पद किंवा मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला सांगितले गेले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने अभिषेक पाटील यांच्याकडून सुरु असलेला दबावतंत्र टाकण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी ठरतो, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल !