मुंबई (वृत्तसंस्था) वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवले. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा बुधवारी जबाब नोंदवला जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या टॉप सिक्रेट कागदपत्रांचा दाखला देत, महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदलीचं रॅकेट उघडकीस आणलं होतं. फडणवीस यांनी असा आरोप केला होता की, काही एजंट्स आणि राजकीय नेत्यांच्या मदतीने अनेक पोलीस अधिकारी इच्छित पोस्टिंग मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. २५ ऑगस्ट २०२० रोजी तत्कालीन गुप्तचर आयुक्त रश्मी शुक्ला यांनी एका गुप्त माहितीच्या आधारे अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडून परवानगी घेतल्यानंतर काही फोन टॅप केले होते, ज्यात अनेक खळबळजनक गोष्टी उघडकीस आल्या होत्या.
रश्मी शुक्ला यांनी तयार केलेला अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालकांनी राज्याच्या मुख्य सचिवांना हा अहवाल मुख्यमंत्र्यांनाही पाठवला होता. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसेच यासंदर्भात त्यांनी कारवाईची मागणी केली होती. फोन टॅपिंग झालं तेव्हा सीताराम कुंटे हे गृहविभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव होते. आपल्याकडून या प्रकरणी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी घेतली नसल्याचं कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. तसंच काही प्रकरणात फोन टॅपिंगची परवानगी एका नंबरची घेतली आणि दुसरेच नंबर टॅप केल्याचंही कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं.
दरम्यान, मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या अहवालात दहशतवाद यासारखी कृती पकडण्यासाठी फोन टॅप करण्याची परवानगी दिली असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. आणि त्यासाठीच रश्मी शुक्ला यांनी परवानगी मागितली, जी त्यांना देण्यात आली. परंतु भारतीय टेलीग्राफ कायद्यातील तरतुदींना डावलत रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या परवानगीचा गैरवापर केला असल्याचंही नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळे याप्रकरणी आता आयपीएल ऑफिसर रश्मी शुक्ला यांची चौकशी होणार आहे. त्यासंदर्भात मुंबई सायबर पोलिसांनी त्यांना समन्सही बजावलं आहे.
रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप काय?
एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. या प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, “केंद्र सरकारने काही नियम दिले आहेत. त्यात कोणत्या प्रकारात फोन टॅप करता येतात याविषयी सांगण्यात आले आहे. यात राष्ट्र घातक कृत्य, परकीय देशातील अतिरेकी संघटनेशी संबंध या प्रकारांशिवाय इतर परिस्थिती फोन टॅपिंग करता येत नाही. याला अपवाद येथील शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीचा फोन टॅप करु शकतो. त्यामुळे रश्मी शुक्ला यांनी जी कारणं दिली होती ती संयुक्तिक नव्हती. त्यांनी ज्या फोन टॅपिंगच्या परवानग्या घेतल्या त्या चुकीच्या नावाने घेतल्या होत्या. परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार करण्यात आला. यात अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे. हे अनेकवेळा करण्यात आलं.”