जळगाव (प्रतिनिधी) रोटरी क्लब जळगावमध्ये महिला समितीतर्फे काव्याच्या श्रावणसरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी परिवारातील महिलांनी श्रावण महिन्याच्या अनुषंगाने खान्देशातील कवींच्या कविता सादर केल्या. सुरवातीस क्लबचे अध्यक्ष मनोज जोशी यांनी कविता सादर करणाऱ्या महिला सदस्यांचे स्वागत केले. महिला समिती अध्यक्षा सौ. विनया जोशींसह मानद सचिव ॲड. हेमंत भंगाळे यांची मंचावर उपस्थिती होती.
स्वाती ढाके यांनी बालकवींची श्रावणमासी हर्षमानसी, मधुरा जहागिरदार यांनी बहिणाबाई चौधरी यांची ‘बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हनू नई’, डाॅ. माधुरी कासट यांनी ना. धों. महानोर यांची ‘या नभाने या भुईला दान द्यावे’, वृशाली जोशी यांनी अशोक जोशी यांची ‘येईल का कधी असाही श्रावण’, आदिती कुळकर्णी यांनी ‘अनंत तारा नक्षत्रेही अनंत या गगनात’ ही बालकवींची कविता, ज्योत्स्ना लाहोटी यांनी प्रा. रमेश लाहोटी यांची ‘क्यों राह निहारु मै सावन की’, वनिता वेद यांनी चारुता पेंढरकर यांची ‘२१ व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा’, विनया जोशी यांनी बा. सी. मर्ढेकर यांची ‘आला आषाढ-श्रावण’, ‘आल्या पावसाच्या सरी’ तर सीमा खिंवसरा यांनी स्वरचित ‘घट घुमड घुमड मन उमड उमड’ कविता सादर केली. डॉ. साधना पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तर डॉ. शुभदा कुळकर्णी यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमास रोटरी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.