पाचोरा (प्रतिनिधी) गरिबीच्या छायेत वाढलेले आणि शिक्षणासाठी संघर्ष केलेले दोन भावंडं – वाल्मिक पाटील व लक्ष्मण पाटील – यांनी आपल्या आई-वडिलांच्या ५३व्या लग्न वाढदिवसानिमित्त एक वेगळा उपक्रम हाती घेत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. “पुस्तक तुला” उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी पाचोरा तालुक्यातील ८ वाचनालये आणि अभ्यासिकांना स्पर्धा परीक्षेच्या महत्वाच्या पुस्तकांचे वाटप केले.
शेतकरी दांपत्य अरुण मोतीराम पाटील आणि सरुबाई पाटील यांच्या संसाराच्या ५३ वर्षांच्या प्रवासानंतर त्यांच्या मुलांनी एक भावनिक आणि प्रेरणादायी आदरांजली अर्पण केली आहे. लहानपणी शेतीच्या कामात आई-वडिलांबरोबर राबलेल्या आणि शिक्षणासाठी पुस्तकांची मारामार अनुभवलेल्या या भावंडांनी, आजच्या विद्यार्थ्यांना तोच संघर्ष टाळता यावा म्हणून हा स्तुत्य उपक्रम राबवला.
वाल्मिक पाटील हे सध्या शिक्षक आहेत, तर लक्ष्मण पाटील पोलीस खात्यात कार्यरत आहेत. दोघांनी मिळून आपल्या आई-वडिलांचे गंगापूजन करून त्यांना विवाह जयंतीच्या दिवशी कीर्तन व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम अर्पण केला. त्यानंतर गावात पंगत देखील आयोजित करण्यात आली.
या उपक्रमाचा विशेष भाग म्हणजे वडिलांच्या वजनाइतकी पुस्तके शहरातील विविध वाचनालयांना भेट देण्यात आली. त्यामुळे अभ्यास करणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक ती साहित्य मिळवून देण्यात मदत होणार आहे. “आपण मोठे अधिकारी होऊ शकलो नाही, पण आपल्या तालुक्यातील इतर मुले यशस्वी होऊन पालकांचे नाव उज्वल करू शकतील, हीच इच्छा या पुस्तक तुला उपक्रमामागे आहे,” असे वाल्मिक पाटील यांनी सांगितले.