मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील सर्वात विक्रमी तापमान असलेल्या विदर्भात रविवारी जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे विदर्भातील जनतेला थोडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज्यात पुढचे दोन दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस राहिलं असा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे.
वर्ध्यात 45.1 अंशावर पोहोचल्याने अनेकांना उन्हाचा तडाखा बसला होता. पण वर्धा,अमरावतीत मेघगर्जना आणि वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे दिलासा मिळाला. पण, अचानक आलेल्या या पावसामुळे शेतातील भाजीपाला, आंबा, लिंबासह पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच कारंजा शहरातील उप बाजार समिती प्रांगणात साठवून ठेवण्यात आलेला शेतमाल भिजला. अचानक आलेल्या पावसानं गहू, हरभरा, तूर भिजल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. पुढचे दोन दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.