जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विश्वंभर रत्नाकर खडके (वय २१, रा. बीड) या विद्यार्थ्याने वसतीगृहामधील खोलीत लॅपटॉपच्या चार्जरच्या वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २६ रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बीड येथील मूळ रहिवासी विश्वंभर खडके हा विद्यार्थी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेली कम्युनिकेशनच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होता. महाविद्यालयाच्या वसतीगृहामध्ये तो आपल्या मित्रासोबत राहत होता. महाविद्यालयात ट्रेडिशनल-डे सुरु असल्याने सर्व विद्यार्थी वेगवेगळी वेशभूषा परिधान करुन महाविद्यालयात आले होते. याठिकाणी विश्वंभर खडके देखील आला होता. मात्र, दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तो वसतीगृहावर निघून गेल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. त्यानंतर खोलीचा दरवाजा आतून बंद करत विश्वंभरने लॅपटॉपच्या चार्जरच्या वायरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
दरवाजा उघडताच दिसला मित्राचा मृतदेह !
सायंकाळी विश्वंभरचा रुम पार्टनर शिवमसिंह राजपूत हा खोलीवर आला. परंतु, खोली आतून बंद असल्याने त्याने दरवाजा ठोठवला. मात्र, आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने शिवमसिंह याने रुमचा दरवाजा जोरात ढकलला. या वेळी रुमची कडी उघडल्याने शिवमसिंह याला आपला मित्र विश्वंभर हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याला पाहताच शिवमसिंह याने मोठा आक्रोश केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी येथे मोठी गर्दी केली.
पंचनामा करुन मृतदेह शासकीय रुग्णालयात रवाना !
शिवमसिंह याने आक्रोश करताच आजूबाजूच्या खोलीतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या खोलीच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी घटनेची माहिती होस्टेलचे रेक्टर आणि महाविद्यालय प्रशासनाला दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत एमआयडीसी पोलिसांना कळवले. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, नितीन ठाकूर, मुकेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचमाना केला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवला.
कुटुंबियांकडूनच स्पष्ट होणार कारण !
मुलाने आत्महत्या केल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने विश्वंभरच्या कुटुंबियांना दिल्यानंतर ते जळगावकडे रवाना झाले आहेत. पहाटेच्या सुमारास ते जळगावात आल्यानंतर विश्वंभरच्या आत्महत्येचे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.