मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपसोबत फारकत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत तीन पक्षांचे सरकार स्थापन केले. पण, भाजपकडून सुरुवातीपासूनच राज्यात सरकार कधी पडेल याचे मुहूर्त दिले जात आहेत. तसेच, हे तीन पक्षांचे सरकार आहे. अमर अकबर अँथनी अशी यांची तीन दिशेला तीन तोंडे आहेत. हे सरकार आपापसांतच भांडून पडेल, अशी खोचक टीका भाजपाचे खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.
यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “हे तीन पक्षांचं सरकार आहे. यांच्यात ताळमेळ नाहीये. हे एकमेकांच्या पायात पाय घालून पडणारं सरकार आहे. अमर अकबर अँथनी अशी यांची तीन दिशेला तीन तोंडं आहेत. हे सरकार आपापसांतच भांडून पडेल. आम्हाला हे सरकार पाडण्यासाठी काही करण्याची गरजच नाहीये”, असं दानवे म्हणाले.
दरम्यान, अमर, अकबर, अँथनी या विशेषणावरून त्यांनी सरकारला सिनेमाचीच उपमा दिली आहे. “सिनेमा कितीही खराब असला आणि एकदा तिकीट काढलं, तर माणसांना पूर्ण वेळ बसावंच लागतं. पण कधीकधी प्रेक्षकांमध्ये प्रक्षोभ झाला, तर अनेक चित्रपट बंद पडताना पाहिलेत. आम्ही त्यांच्या चांगल्या कामांना पाठिंबा देऊ, वाईट कामांना विरोध करू”, असं दानवे म्हणाले आहेत.
















