जळगाव (प्रतिनिधी) अयोध्यानगर व एमआयडीसीतील सहा कॉलन्यांतून गेलेल्या १३२ केव्ही उच्च दाब वाहिनीमुळे अपघातांत वाढ होत आहे. त्यामुळे ही वाहिनी ताबडतोब हटवण्यासाठी मनसेतर्फे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. सोमवारी महापारेषणला यासंदर्भात मनसेने इशारा दिला.
‘अयोध्यानगर, सद्गुरूनगर, रामचंद्रनगर, लीला पार्क, नारायण पार्क, प्रेमचंद पार्क, गीताईनगर, द्वारका, कौतिकनगर, पंढरपूरनगर या कॉलन्यांमधून १३२ केव्ही वीजवाहिनी गेली आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांत अनेक छोटेमोठे
अपघात वाहिनीमुळे झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी दोन तरुण गच्चीवर गेले असता स्पार्किंग होऊन ते भाजले गेले. ज्या वेळेला वीजवाहिनी टाकण्यात आली तेव्हा परिसरात वस्ती नव्हती. शहराचा विस्तार वाढल्याने या परिसरातील जमिनी शासकीय नियमानुसार बिनशेती झाल्या. तत्कालीन नगरपालिका व आताच्या महापालिकेने घर बांधकामाची परवानगी दिली. बांधकामे होत असताना महापारेषण विभागाने हरकत का घेतली नाही? असा प्रश्न मनसेतर्फे उपस्थित करण्यात आला आहे. दोन महिन्यांत नऊ तरुण अयोध्यानगर परिसरात या वीजवाहिनीमुळे भाजले गेले आहेत. त्यामुळे जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. महापारेषणच्या कार्यकारी अभियंत्यांना जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, अविनाश पाटील, संदीप मांडोळे यांनी निवेदन दिले.
होगाडे जळगावात येणार
वीज ग्राहकांसाठी सातत्याने लढा देणारे वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश होगाडे यांच्याकडे जळगावातील विषय कळवण्यात आला आहे. त्यामुळे जनआंदोलन उभारण्यासाठी अध्यक्ष होगाडे हे स्वतः जळगावात अयोध्यानगर व एमआयडीसीतील रहिवाशांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करतील.