नवी दिल्ली (वृत्तसंस्था) श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने अर्धशतक ठोकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम ऋषभ पंतने केला आहे. पंतने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा 40 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. पंतने अवघ्या २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्डेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनं भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने अर्धशतक झळकावत नवा विक्रम केला आहे. भारताचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंतने आज अगदी टी20 क्रिकेटप्रमाणे फलंदाजी करायला सुरुवात केली असून 28 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार झळकावत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर काही चेंडू खेळताच तो बादही झाला. पण तोवर त्याने भारताकडून सर्वात जलदगतीने कसोटी अर्धशतक झळकावण्याचा विक्रम नावे केला. याआधी हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता. त्यांनी 1982 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 30 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.