जळगाव (प्रतिनिधी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणीदरम्यान जप्त करण्यात आलेले मौल्यवान दागिने व्यवहार पारदर्शी असल्यामुळेच बाफना ज्वेलर्सला परत मिळाल्याची माहिती बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशीलकुमार बाफना व सिद्धार्थ बाफना यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवार, २७ एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत बाफना यांनी सांगितले की, त्यांच्यासह शहरातील अन्य सराफ व्यावसायिकांचे सोने चांदी, हिरे व इतर मौल्यवान वस्तूंची ने-आण करण्याचे काम सिक्वेल लॉजिस्टिक कंपनीमार्फत केले जाते. २० एप्रिल रोजी मुंबई येथून या कंपनीचे वाहन (एमएच १२, व्हीटी ८६२९) सोने, चांदी, हिरे घेऊन येत असताना कुसुंबा नाक्याजवळ प्रांताधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सुधळकर यांच्या पथकाने तपासले. त्यावेळी त्यात आढळलेल्या मौल्यवान वस्तूंविषयी वाहनातील डिलिव्हरी असिस्टंटने माहिती दिली.
मात्र, कागदपत्रांची तपासणी अथवा अधिकची चौकशी न करता सदर वाहन एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमा केले होते. त्यानंतर जळगावातील व पाठोपाठ नाशिक येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाफना ज्वेलर्सच्या दालनात चौकशी केली होती. सोने, चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या तपशिलाची खात्री झाल्यानंतर सदर मौल्यवान वस्तू शुक्रवार, २६ एप्रिल रोजी आर.सी. बाफना ज्वेलर्सकडे सुपुर्द करण्यात आल्या. या वस्तूंच्या वजनाविषयी निर्माण झालेला संभ्रम पाहता त्यांचे वजन २७ किलो नाही तर २१ किलोच आहे, अशी माहिती देखील बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशीलकुमार बाफना व सिद्धार्थ बाफना यांनी पत्रकार परिषदेत दिली.
















