नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने आज चांगलेच फटकारले. नुपूर शर्मा यांनी टीव्हीवर येऊन संपूर्ण देशाची माफी मागावी, असे निर्देश देखील कोर्टाने दिले आहेत.
नुपूर शर्मा यांनी आपल्यावर विविध राज्यांत दाखल झालेले सर्व गुन्हे दिल्लीला वर्ग करण्यात यावेत, यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी करताना टीव्हीवरुन देशाची माफी मागावी आणि आपले वक्तव्य मागे घ्यावे, असे निर्देश न्यायालयाने म्हटले आहे. मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपच्या प्रवक्ता नुपुर शर्मा यांच्या विरोधात देशभरात मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या. इतकंच नाही तर अरब राष्ट्रातूनही निषेधाचे सूर उमटले. त्यानंतर भाजपनं शर्मा यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी केली.
नुपूर शर्मावर दिल्ली, कोलकाता, बिहारपासून पुण्यापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत. आपल्या याचिकेत नुपूरने म्हटले होते की, तिला सतत वेगवेगळ्या राज्यातून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. नुपूर शर्माची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, नुपूर यांनी विधानाबद्दल माफी मागितली आहे आणि ते मागे घेतले आहे. त्यावर कोर्ट म्हणाले- त्यांनी टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागायला हवी होती. उदयपूरमधील दुर्दैवी घटनेला त्यांचे वक्तव्य जबाबदार असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिच्या हट्टीपणाबद्दल आणि अहंकाराबद्दल टीका केली. ती एका पक्षाची प्रवक्ता आहे, तिच्या डोक्यात सत्ता गेली आहे. असे लोक धार्मिक नसतात. कारण धार्मिक लोक प्रत्येक धर्माचा आदर करतात, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.













