जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे व भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्यातील वादाचा परिणाम जिल्हा बँक निवडणुकीत होईल अशी राजकीय चर्चा सुरू झालीये. पण आमदार चिमणराव पाटील यांनी निवडणूक बिनविरोध होण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच सर्वपक्षीय पॅनल निश्चित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा बँकेचे संचालक व शिवसेनेचे आमदार तसेच सर्व पक्षीय निवडणूक पॅनेलचे कोअर कमिटी चे सदस्य चिमणराव पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, दोघांच्या वादामुळे बँक निवडणुकीत भाजप आपली वेगळी चूल मांडेल असे काही वाटत नाही. कारण यापूर्वी ही खडसे व महाजन यांचे वाद सुरूच होते. त्यामुळे सर्वपक्षीय पॅनल वर त्याचा काही फरक पडेल असे आपल्याला वाटत नाही.
सर्वपक्षीय पॅनल निश्चित होईल, यावर आपला विश्वास आहे. कारण ही शेतकऱ्यांची बँक असून त्यांच्या हिताचे काम करावयाचे आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्षीय वादाचा कोणताही प्रश्न नाही. सर्वपक्षीय पॅनल झाले तरी ही बिनविरोध होणार असे सांगून ते म्हणाले, ही लोकशाही आहे. या ठिकाणी कोणीही उमेदवार होऊ शकतो. त्यामुळे कोणीतरी उभे राहिलच. मात्र आम्ही सर्व पक्षीय पॅनल म्हणून त्याचा सामना करू. असं ते म्हणाले.