मुंबई (वृत्तसंस्था) काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर देशाच्या सहकार खात्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देण्यात आली. शहांकडे सहकार खाते गेल्यामुळे महाराष्ट्रातील सहकारावर याचा परिणाम होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. परंतु, या निर्णयाचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्वागत केले आहे. सहकार खातं त्यांच्याकडे गेल्याने घाबरण्याचं कारण नाही, आम्ही त्याकडे सकारात्मकतेने पाहतो, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्र सरकारने नवं मंत्रालय तयार केलं आहे. केंद्राला सहकाराला काही मदत करायची इच्छा असेल. सहकार हा राज्याचा विषय आहे. अमित शहांकडे नव्या खात्याची जबाबदारी गेल्याने घाबरण्याचं कारण नाही. त्यातून काही चांगलं होऊ शकतं. शहांना सहकाराचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या मनात काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या अंमलात आणतील, असं राऊत म्हणाले.
अमित शहा हे सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्यांना क्षेत्रात काही चांगलं काम करावसं वाटत असेल, त्यामुळे ते खातं त्यांनी त्यांच्याकडे घेतलं असेल. ते सहकार क्षेत्रासाठी चांगले आणि सकारात्मक निर्णय घेतील अशी आम्ही आशा करतो, असा चिमटाही त्यांनी काढला.