मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्ष भाजपकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात असली, तरी या सरकारसाठी एक आनंदाची बातमी आलीय. ती म्हणजे ‘प्रश्नम’ या संस्थेने आपल्या त्रैमासिक अहवालात देशातील प्रमुख १३ राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच ‘नंबर वन’ असल्याचे म्हटले आहे.
प्रश्नमनं भारतातील विविध राज्यांसाठी मुख्यमंत्री त्रैमासिक मान्यता रेटिंग सुरू केली आहे. त्यात बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. या १३ राज्यांमध्ये देशातील एकूण लोकसंख्येच्या ६७ टक्के लोक राहतात. या सर्वेक्षणात नुकत्यात विधानसभा निवडणुका पार पडलेल्या तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि आसामचा समावेश नाही. तर आंध्र प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये पॅनेल नसल्यामुळे या राज्यांचाही सर्वेक्षणात समावेश करता आला नसल्याचं सांगितण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरेंना ४९ टक्के मतं
सर्वेक्षणानुसार असं समोर आलं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. सर्वेक्षणात जवळपास ४९ टक्के मतदारांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा उद्धव ठाकरेंना मतदान करणार असल्याचं काही मतदारांनी सांगितलं. या यादीत उद्धव ठाकरे अव्वल आहेत. त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना ४४ टक्के पसंती मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आहेत. राज्यातील सर्वेक्षण झालेल्या ४० टक्के मतदारांनी त्यांच्या कामगिरीला मान्यता दिली.
प्रश्नमने घेतलेल्या सर्वेक्षणात १३ राज्यात मिळून एकूण १७ हजार ५०० जणांनी आपलं मत नोंदवलं. महत्वाची बाब म्हणजे हे सर्वेक्षण सर्वात मोठ्या सर्वेक्षणापैकी एक असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, या सर्वेक्षणात 3 पर्याय देण्यात आले होते.
१. मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब असून ते पुन्हा मु्ख्यमंत्री म्हणून नको.
२. मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असली तरी पुन्हा त्यांना मत देणार नाही.
३. मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असून, पुन्हा हेच मुख्यमंत्री हवे.