कोल्हापूर (वृत्तसंस्था) पंढरीच्या वारीतून जात असताना कमल तुकाराम धनगर (वय ५५, रा. आसुर्ले, ता. पन्हाळा ) या वारकरी महिलेचा तोल गेल्याने ट्रॅक्टर- ट्रॉलीतून पडून मृत्यू झाला. ही घटना उदनवाडी ब्रिजजवळील सर्व्हिस रोडवर सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली.
आसुर्लेपैकी दरेवाडीतून भैरवनाथ पायी दिंडी मंगळवारी (२०) पंढरपूरला रवाना झाली होती. त्या दिंडीतून कमल धनगर ह्या देखील गेल्या होत्या. सांगोल्याजवळील उदनवाडी ब्रिजजवळ सर्व्हिस रोडवर दिंडीतील ट्रॅक्टर पंढरपूरच्या दिशेन जात असताना पुढच्या ट्रॉलीमध्ये बसलेल्या कमल धनगर पाण्याची चूळ भरताना त्यांचा तोल गेल्याने दोन्ही ट्रॉलीमध्ये असणाऱ्या लोखंडी अँगलवर त्यांचे डोके आपटले व खाली पडल्यानंतर त्या महिलेच्या दोन्ही पायांवरून ट्रॉलीचे मागील चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली.
कमल धनगर यांना बेशुद्धावस्थेत सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, धनगर या पहिल्यांदाच पंढरीच्या वारीतून विठ्ठलाचे दर्शन घ्यायला गेल्या होत्या. त्यांच्या मागे पती, तीन मुली असा परिवार आहे.