जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नशिराबाद जवळ असणाऱ्या वाघूर धरणाच्या पाटाच्या पुलाच्या चारीतील वाहत्या पाण्यात पोहायला गेलेल्या ३ बालकांचा बुडून मृत्यु झाल्याची घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (दि.२८ सप्टेंबर) सोमवार रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद येथील भवानी नगरचे रहिवासी मोहित दिलीप नाथ (वय-१२), आकाश विजय जाधव (वय-१३), ओम सुनील महाजन (वय-११) हे तिघेही वाघूर धरणावर पोहायला गेले होते. दरम्यान, सुभाष वाणी यांच्या शेताजवळ पाटाच्या पुलाच्या चारीत पाण्यात पोहण्यास उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी ग्रामस्थांसह पोलीसांनी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने तिघांचे मृतदेह काढण्यात आले असून जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. यावेळी एपीआय प्रवीण साळुंखे, सचिन कापडणीस, हवालदार प्रवीण ढाके, पोना रवींद्र इंधाटे यांनी धाव घेतली होती. सोपान विठोबा वाणी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.