जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महानगरातील विस्तारित भाग असणार्या सावखेडा शिवारातील वाघनगर तसेच परिसरात वाघूर धरणातील पाण्याचा पुरवठा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या पाणी पुरवठ्याची चाचणी पार पडली असून शुक्रवार पासून प्रत्यक्षात पाणी पुरवठा सुरू होणार असून या भागातील सुमारे ३० हजार आबालवृध्दांची तहान यामुळे खर्या अर्थाने भागणार आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या भगिरथ प्रयत्नांनी तब्बल २६.६५ किलोमीटरवरून धरणाचे पाणी आणतांना गेल्या सुमारे चार वर्षांपासून अडथळ्यांची शर्यत पूर्ण करत ही योजना पूर्णत्वाकडे आली आहे. या माध्यमातून ना. गुलाबराव पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्ततादेखील होणार आहे. दि.९ एप्रिल २०२१ रोजी शुक्रवारी सायंकाळी ५.०० वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व आमदार राजूमामा भोळे व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत उदघाटन समारंभ होणार आहे.
परिसर तहानलेला
वाघनगरसह परिसरातील कॉलन्या या महापालिका हद्दीत असल्या तरी त्यांचा समावेश जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात होतो. या भागात सुमारे ३० हजार नागरिक राहत असून अद्यापही येथे महापालिकेने पाणी पुरवठा यंत्रणा उभारलेली नाही. परिणामी या भागातील लोकांना पाण्यासाठी विहिर, कुपनलीका आणि टँकर आदींवर अवलंबून रहावे लागते. या भागाची समस्या लक्षात घेऊन ना. गुलाबराव पाटील यांनी सहकार राज्यमंत्री असतांना २७ फेब्रुवारी २०१७ रोजी वाघूर धरणावरून या भागात थेट पाणी पुरवठा करण्याच्या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळवून दिली होती. यानंतर १० ऑक्टोबर २०१० रोजी वाघूर धरणातील पाणी वाघनगर योजनेसाठी आरक्षीत करण्याच्या निर्णयाला मान्यता मिळाल्यानंतर या योजनेच्या कामाला गती मिळाली.
१९ कोटी २५ लाखांची योजना
या पाणी पुरवठा योजनेसाठी २६ मार्च २०१८ रोजी वर्कऑर्डर निघाली. यात पहिल्यांदा ८ कोटी ४१ लाख रूपयांची निवीदा काढण्यात आली. तर याच योजनेत जीआय पाईपांसह अन्य ६ कोटी ५० लाख रूपयांचा खर्च महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करणार असल्याचे निश्चीत करण्यात आले. यात ठेकेदाराला वाघूर धरणावरील जॅकवेल, धरणापासून ते टाकी पर्यंतची पाईपलाईन, विविध टाक्या आणि वितरण प्रणाली आदींचे काम देण्यात आले असून मजिप्राकडे जीआय पाईप, वीज बील, टिसीएल पावडर, अलम आदींची तरतूद करावी लागणार आहे.
अडथळ्यांची शर्यत
वाघूर धरणातल्या जॅकवेलमधून थेट वाघ नगरात पाणी आणण्यासाठी कंडारी, उमाळा, रायपूर, कुसुंबा, मेहरूण आदी शिवारांमधून २६.६५ किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. यात कंडारी ते उमाळा दरम्यानचा थोडा भाग हा वन खात्याच्या अंतर्गत येत असल्याने येथून पाईपलाईन टाकण्यासाठी खूप अडचणी आल्या. यासाठी दिल्लीपर्यंतच्या कार्यालयात पाठपुरावा करण्यात आला. यामध्येच बराच काळ व्यतीत झाला. तर या मार्गातील अतिक्रमण, हायवेचे चौपदरीकरण, काही ठिकाणी शेतकर्यांचा विरोध या सर्व अडथळ्यांवर मात करावी लागली. या प्रकल्पासाठी मजिप्रासह वन खाते, महसूल, ग्रामपंचायत, महापालिका, महावितरण, एमआयडीसी, बीएसएनएल आदी खात्यांच्या परवानग्या घ्याव्या लागल्या.
अशी आहे योजना
वाघ नगर पाणी पुरवठा योजनेमध्ये वाघूर धरणाच्या काठावर जॅकवेल खोदण्यात आलेली आहे. येथील पाणी उमाळा येथील टाकीमध्ये आणले जाते. येथून महामार्गाच्या बाजूने पाईपलाईनच्या मदतीने हे पाणी नवीन रायपूर येथील ब्रेक प्रेशर टँक (बीपीटी) या प्रकारातील टाकीत आणले आहे. येथून याच प्रकारातील दौलतनगर भागात असणार्या टाकीमध्ये हे पाणी आणले जाते. येथून कोल्हे हिल्स परिसरात असणार्या जलशुध्दीकरण प्रकल्पात हे पाणी येते. या ठिकाणी शास्त्रीय पध्दतीत पाणी शुध्द करून ते मुंदडा हिल येथे असणार्या टाकीत नेण्यात आले असून येथूनच खालील बाजूस असणार्या वाघनगर आणि परिसरातील वस्तीला येथून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
वाघूर धरणावरून वाघ नगरात पाणी आणणे हे अशक्यप्राय कोटीतील काम होते. यात विविध ग्रामपंचायतींसह महापालिकेच्या हद्दीतील कामांसह विविध शासकीय खात्यांच्या परवानगी आवश्यक होत्या. मात्र या सर्व बाबींची पूर्तता करून ही योजना पूर्णत्वाला आली आहे. यात लक्षणीय बाब म्हणजे नैसर्गिक उताराचा वापर करून या पाण्याचे सावखेडा शिवारातील वाघनगर परिसरात वितरण केले जाणार आहे. यामुळे अगदी तिसर्या मजल्यापर्यंत पाणी सहजपणे पोहचणार आहे. ही योजना पहिल्यांदा संबंधीत कंत्राटदार चालवणार असून नंतर याला सावखेडा ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात येणार आहे.
पालकमंत्र्यांचे भगिरथ प्रयत्न
सावखेडा शिवारातील नागरिक हे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे मतदार आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत या भागाला कायमस्वरूपी पाणी पुरवठा करणार असल्याचे अभिवचन दिले होते. यानंतर सातत्याने पाठपुरावा करून, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनेक अडचणींवर मात करून वाघनगर पाणी पुरवठा योजना पूर्णत्वाला आली आहे. येथे पाण्याच्या शुध्दीकरणासह वितरणाची चाचणी पूर्ण झाली असून लवकरच या योजनेचे विधीवत लोकार्पण होणार आहे. या योजनेसाठी ना. गुलाबराव पाटील यांनी केलेले भगिरथ प्रयत्न मोलाचे ठरले असून योजनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अभिवचनाची पूर्तता देखील केली आहे.