नांदुरा (प्रतिनिधी) जनतेचा विश्वास हीच माझी प्रॉपर्टी आहे, मी सदैव जनतेच्या सेवेत असून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. नांदुरा तालुक्यातील गेल्या दहा वर्षातील विकास कामांचा अनुशेष आपण भरून काढू असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले. नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे महाविकास आघाडीच्या आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते.
नांदुरा ते जळगाव जामोद रस्त्यावर असलेल्या रेल्वे गेटचा प्रश्न आमदार राजेश एकडे यांच्या सहकार्याने सोडवला जाईल असे आश्वासन उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला मी तडा जाऊ देणार नाही. माझी बांधिलकी सामान्य जनतेशी आहे असे ते म्हणाले. श्रीराम पाटील यांनी आतापर्यंत शेकडो कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या भागातही ते मोठे उद्योगधंदे आणतील व बेरोजगारीचा प्रश्न मिटवतील असा विश्वास मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांनी व्यक्त केला. यावेळी प्रसन्नजीत पाटील, अरविंद कोलते, संतोष रायपुरे, वनिता गायकवाड यांचीही भाषणे झाली. या सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मत देऊन श्रीराम पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.