कोल्हापूर (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर पूरपरिस्थितीचा पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातल्या चिखली गावात दोघांनीही आज पाहणी केली व तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. दरम्यान, हे दोन्ही दिग्गज आमने-सामने आल्याची घटना घडली. कोल्हापुरातील शाहुपुरी चौकात हे आजीमाजी मुख्यमंत्री समोरासमोर आले होते.
त्याचं झालं असं, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या ठिकाणी होते. याची माहिती उद्धव ठाकरेंना मिळताच देवेंद्र फडणवीसांना तिकडेच थांबण्याचा निरोप पाठवला गेला. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंचा निरोप पाठवला. “वेगवेगळी पाहणी करण्यापेक्षा एकत्र पाहणी करूया” असा फोन उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांना गेला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची विनंती मान्य करून शाहुपुरीतच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एकत्र पाहणी झाली.
यावेळी, तातडीची मदत दिलीच पाहिजे पण एक कायमस्वरुपी मार्ग काढला पाहिजे अशी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर, यावेळी शिवसैनिकांकडून ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निरोप दिल्यामुळे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस शाहुपुरीतच थांबले होते, अशी देखील माहिती समोर आली आहे. या वेळी फडणवीसांसोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची देखील उपस्थिती होती. या भेटीमुळे आता विविध राजकीय चर्चा देखील रंगू लागल्या आहेत.