चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे दि.२७ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक मराठी राजभाषा गौरव दिन’ व ‘कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिवस’ या निमित्ताने ‘सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा’, ‘काव्य वाचन’, राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा’ व ‘विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन ‘कविवर्य कुसुमाग्रज’ तसेच ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी’ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.एस.कोल्हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ.व्ही.टी.पाटील, उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ.के.एन.सोनवणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.एस.हळपे, पंकज नागपुरे (सुप्रसिद्ध चित्रकार, प्रताप विद्यामंदिर, चोपडा), एम.टी.शिंदे, एन.बी.शिरसाठ व रजिस्ट्रार डी.एम. पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ.के.एन. सोनवणे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यानी मराठी भाषा वाचविण्यासाठी बोलीभाषेत व्यवहार करायला हवा.बोली टिकल्या तरच भाषा जगातील. मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा संवर्धनाची गोडी निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे’. याप्रसंगी वक्त्यांचा परिचय एम. टी. शिंदे यांनी करून दिला.
यावेळी पंकज नागपूरे ‘सुंदर हस्ताक्षर’ या विषयावरील कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘ मराठी भाषेचे अक्षरे जगभरात पोचून मराठीचा प्रचार आणि प्रसार सर्वांनी करायला हवा.उभ्या व आडव्या रेषेतील अंतर ज्याला कळले त्याला जीवन कळले. ज्याचे अक्षर सुंदर,त्याचे विचारही सुंदर असतात. प्रत्येक अक्षराला एक लय व तोल असतो.वळणदार अक्षर गिरविण्यातून मनाची समाधी साधता येते. प्रत्येक माणसाला अक्षरांशी खेळता यायला हवे. वळणदार अक्षरातून विचारांना सुंदर वळण देता येते. सौंदर्य दृष्टिकोन मराठी भाषेतील अक्षरातून निर्माण होतो. मराठीचा इतिहास समजून घेण्यासाठी मोडी लिपीचा अभ्यास करावा. आपली बोलीभाषा व्यवहारात सातत्याने वापरली तरच मराठी भाषेचे संवर्धन होण्यास मदत होईल. यावेळी त्यांनी ‘करूया सृजनांचे बिजारोपण’ या उपक्रमातून मराठीचा प्रचार कसा केला हे समजावून सांगितले. त्याचबरोबर प्रत्येक अक्षरात डिझाईन कसे करायचे? हे प्रात्यक्षिकासह तसेच वळणदार अक्षरांचे नमुने पीपीटीद्वारे सादर करून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन शंका समाधान केले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे सादरीकरण केले. यात खैरनार मोहिनी (टी. वाय.बी.ए-सर्वात्मका शिवसुंदरा), कृष्णा धारपवार (टी. वाय.बीएस्सी- कणा), राजपूत मोहिनी (टी. वाय. बी. ए-शहरातील पाच पुतळे), हर्षल शिंपी (टी वाय बी ए- कणा), शितल करंकाळे (टी वाय बी ए-कणा), पाटील संजीवनी (टी वाय बी ए-मराठी माती), जी.बी. बडगुजर (आधार) तसेच डॉ. एम.एल.भुसारे (प्रेम कर भिल्लासारखं) आदींनी कविवर्य कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांचे सादरीकरण केले. यावेळी मराठी विभागातील महाजन जयश्री या माजी विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त करून ‘किती मारशील उड्या’ हे गीत सादर केले.
याप्रसंगी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने मराठी विभागातर्फे आयोजित ‘निबंध’, ‘स्वलिखित काव्यलेखन’, ‘वक्तृत्व’, ‘कविता गायन’, ‘उखाणे’, ‘पोस्टर’ ‘शब्द संपदा’ व ‘कथाकथन स्पर्धा’ तसेच ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त’ आयोजित ‘निबंध’, ‘देशभक्तीपर गीत लेखन’ व ‘घोषवाक्य स्पर्धेत’ प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. एस. कोल्हे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ‘मराठी भाषा गर्व वाटावी अशी आहे. आपले चालणं, बोलणं, व्यक्त होणं हे मराठी भाषेतूनच होते म्हणून भाषेवर प्रेम करावे. भाषा जिवंत ठेवण्याचे काम बोली भाषिक करतात.भाषांची सरमिसळ होऊनही मराठीचे अस्तित्व आबाधित आहे ही गोष्ट महत्त्वाची वाटते.विचार व्यक्त करण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी स्थानिक बोलीचा वापर करावा तरच मराठी भाषा जगेल. मराठी ही ज्ञानभाषा व शासन व्यवहाराची भाषा झाली पाहिजे. मराठी भाषेत विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत, त्यासाठी वाचन व त्याचा व्यवहारातील वापर वाढविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी शेवटी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.एम. एल.भुसारे यांनी केले तर आभार एन.बी.शिरसाठ यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी एम. टी. शिंदे यांनी ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत सादर केले व कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.एस.ए.वाघ, डॉ. आर.आर.पाटील, डी. डी. कर्दपवार, एन.बी.पाटील, सौ.पुष्पा दाभाडे, जी.बी. बडगुजर, संदीप देवरे, एस.जी.पाटील, नेहा राजपूत, आशा पाटील, मोहिनी राजपूत, संजीवनी पाटील व माहेश्वरी धनगर इत्यादींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, पालक, महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.