जळगाव (सुरेश उज्जैनवाल) हरिद्वारच्या कुंभ मेळ्याने कोरोनाचा जणू स्फोटच घडून आणला आहे. लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविक, श्रद्धाळू पैकी काही आता कोरोना वाहक ठरू शकतात. देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना खरं तर या मेळ्यात कोरोना प्रोटोकॉलची अंमलबजावणी अत्यंत कडकपणे करायला हवी होती, मात्र प्रत्यक्षात त्या प्रोटोकॉलची मनसोक्त टिंगल टवाळीच प्रत्यक्षात पहायला मिळाली.
प्राप्त माहितीनुसार मेळ्यात सहभागी झालेल्या पैकी १० ते १६ एप्रिल दरम्यान सुमारे ३५०० भाविक कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहेत, यात दोघे, तिघे प्रसिद्ध साधू, महंत असून एखाद, दुसऱ्या साधूचा मृत्यू देखील झाल्याचे सांगितले जात आहे. या परिस्थितीसाठी कुणाला जबाबदार धरावे? तिकडे उत्तराखंडचे सरकार निर्लज्जपणे म्हणत आहे, की गंगेत स्नान केल्याने कोरोना संक्रमण होत नाही. तर दुसरीकडे कुंभची तुलना आता देशात गेल्या वर्षी दिल्लीच्या तब्लिगी जमातीच्या हजरत निजामुद्दीन मधील मरकजशी केली जात आहे. कोविड१९ महामारीच्या अगदी सुरुवातीच्या काळात दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये तब्लिगी जमातचा मरकज कोरोना हॉट स्पॉट म्हणून समोर केला गेला. यातील काही लोक कोरोना संकर्मित आढळून आल्यामुळे त्यांना कोरोना बॉम्ब म्हणून घोषित केले गेले, या दरम्यान त्या जमातीच्या लोकांना लोकक्षोभ व बदनामी सहन करावी लागली. निजामुद्दीनच्या मरकजमध्ये तर काही हजारच भाविक सहभागी होते. मात्र हरिद्वारच्या कुंभमध्ये तर लाखोंच्या संख्येत भाविक सहभागी झालेत. त्यातील २००० लोक कोरोना संकर्मित मिळून आलेत, त्यानंतर ही मेळ्यात निर्बंध नाहीच. उलट मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत म्हणतात की, लोकांच्या आरोग्याला प्राथमिकता असली तरी लोकांच्या धार्मिक आस्थेकडे कानाडोळा करता येत नाही.
अन्य धर्मियांसाठी दुहेरी मापदंड कां?
रावत यांचं म्हणणं मान्य केलं तर निजामुद्दीनच्या मरकज मधील भाविकांच्या धार्मिक आस्थे बद्दल काय? त्यांची आस्था ही धार्मिक आस्था नाही का? सरकार हे सोयीस्करपणे विसरत आहे. खर तर आस्थेचा अधिकार कुण्या पक्षाच्या सरकारने नव्हे तर देशाच्या संविधानाने त्यांना दिला आहे. शिस्त, नियम पाळायचे ते फक्त मरकज वाले, गुरुद्वार, चर्च वाल्यानीच, हा दुहेरी मापदंड नव्हे का? सत्ताधारी भाजपने राजकारणापेक्षा माणुसकीचा विचार करावा, या घडीला त्याची जास्त गरज आहे.
कुंभच्या कारणामुळे जर करोनाचा विस्फोट झाला तर त्याची जबाबदारी कुणाची ? याच उत्तर देशाच्या जनतेला हवंय….!
सुरेश उज्जैनवाल, पत्रकार जळगाव