नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दोन वेळा ऑलंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या एका कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी अटकेत आहे. हत्येच्या गुन्ह्याचा तपास सुरु असल्यानं रेल्वेनं आता त्याला नोकरीवरुन निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. सुशीलचे निलंबन २३ मे पासून लागू करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत तो निलंबित राहील.
कुस्तीपटू सागर धनखड खून प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याला पुढील आदेश येईपर्यंत रेल्वेने वरिष्ठ व्यावसायिक व्यवस्थापकपदावरून निलंबित केले आहे. सुशीलला कुस्तीपटू सागर धनखड याच्या हत्येच्या आरोपात २ दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. हत्येच्या आरोपावरून सुशील कुमारविरोधात चौकशी सुरू झाल्यानंतरच रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.
तत्पूर्वी, सुशीलला मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी क्राईम सीन रिक्रियेत करण्यासाठी छत्रसाल स्टेडियममध्ये नेले होते. पोलीस पथक सकाळी गुन्हा घडला त्या जागेवर गेले होते आणि क्राईम सीन क्रिएट करून दुपारपर्यंत परत आले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “या प्रकरणाचा तपास करणार्या पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांचे एक पथक छत्रसाल स्टेडियममध्ये तपासासंदर्भात गेले होते. घटनेच्या दिवशी गुन्हा कोणत्या परिस्थितीत घडला हे जाणून घेण्यासाठी आणि गुन्ह्याचा क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी सुशील कुमार यालाही घटनास्थळी नेण्यात आले.
सोमवारी सुशीलवरही सुमारे ४ तास चौकशी केली गेली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते या प्रकरणाचा वेगवेगळ्या अँगलने तपास करीत आहेत. यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते की, सुशील कुमारची या घटनेची चौकशी करण्यासाठी विचारपूस केली गेली, कोणत्या परिस्थितीत हा गुन्हा कुठे झाला आणि तो घटनेनंतर कुठे गेला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. छत्रसाल स्टेडियमवर ४ ते ५ मे दरम्यान मध्यरात्री सुशील आणि त्याच्या साथीदारांवर झालेल्या हल्ल्यात २३ वर्षीय कुस्तीपटूचा मृत्यू झाला आणि त्याचे दोन मित्र जखमी झाले. या घटनेमागील कारण मॉडेल टाऊन परिसरातील एका मालमत्तेवरील वाद असल्याचे सांगितले जात आहे.
काय आहे प्रकरण?
सुशीलला रविवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर ४ मे रोजी झालेल्या मारहाणीमध्ये २३ वर्षीय कुस्तीपटू सागर धनखड जखमी झाला होता. दुसऱ्या दिवशी त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर सुशील आणि त्याचा साथीदार अजय कुमार जवळपास तीन आठवडे फरार होते. त्यांच्यावर दिल्ली पोलिसांनी इमानही जाहीर केले होते. अखेर रविवारी त्यांना अटक करण्यात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले.