भुसावळ (प्रतिनिधी) कोरोनाच्या काळामध्ये रुग्णांना हात लावण्यासाठी सर्वजण घाबरत होते. अगदी जवळ जाण्यासही भीती वाटत होती. कोरोनाचा प्रादुर्भावासोबत मृत्युदर सुद्धा वाढत होता. अशा कठीण काळात कंत्राटी पद्धतीनी नियुक्त केलेल्या सर्व आरोग्य सेवकांनी आपले कार्य इमाने-इतबारे केले. आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती खुद्द सरकारने व्यक्त केली आहे. त्यामुळे कंत्राटी आरोग्य सेवकांना सलग ११ महिन्याची पुनर्नियुक्ती द्या, अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नी.तू. पाटील यांनी केली आहे.
डॉ.नी.तू. पाटील यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना या महाभयंकर व जागतिक आरोग्य संघटनेने महामारी घोषित केलेल्या, साथरोग आटोक्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्यातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने तसेच साधनसामुग्री व विविध पदांवर कर्तव्य बजावणारे मनुष्यबळ कमी आहे. तसेच covid-19 चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने याला अटकाव करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि जिल्हा एकात्मिक आरोग्य विभाग विभागाच्या यंत्रणेमार्फत ऑनलाईन जाहिराती प्रमाणे जी. एन. एम., ए.एन.एम, डाटा एंट्री ऑपरेटर, फार्मसिस्ट, डॉक्टर, सफाई कामगार, विविध टेक्निशियन, भांडारपाल, वार्ड बॉय आधी पदांची रोजंदारी पद्धतीने हजारोच्या संख्येने नोकरभरती केली गेली. या सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मानित करण्यात आले. ज्या काळामध्ये करोंना रुग्णांना हात लावण्यासाठी सुद्धा नागरिक घाबरत होते,जवळ जाण्यास भीती वाटत होती. कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत होता, मृत्युदर सुद्धा वाढत होता असे असून सुद्धा नियुक्त केलेले सर्व आरोग्य सेवक हे आपले कार्य इमाने-इतबारे करत होते.
आता कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने या कोरोना योध्यांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यावेळेस शासनाला कोरोनाचा अटकाव करण्याची गरज होती. त्यावेळेस सर्व महाराष्ट्रातील आरोग्य सेवकांनी स्वतः च्या जीवाची आणि परिवाराची कुठलीही पर्वा न करता संपूर्ण आपले लक्ष हे कोरोना कार्यात वाहून घेतले आणि आता कुठे संख्या कमी होत आहे असे दिसताच त्यांच्या नोकरीवर गदा आणण्याचे काम हे शासन करत आहे. हा शासनाचा दुप्पटिपणा आहे. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येणार, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. आपल्या शेजारील गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आधी राज्यांमध्ये हे संचारबंदी लागू झाली आहे. सदर लाट महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील covid-19 च्या काळामध्ये जे जे आरोग्य सेवक,करोना योद्धा हे तात्पुरत्या पद्धतीने भरले गेले असतील,त्या सर्वांना पुढील अकरा महिन्यासाठी सलग पुनर्नियुक्ती देण्यात यावी आणि त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यात यावा, असे डॉ. पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते,पालकमंत्री जळगाव, आरोग्य सचिव , सर्व आमदार,जळगाव जिल्हा, खासदार,जळगाव जिल्हा, जिल्हाधिकारी,जळगाव यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव यांना देखील निवेदनाची प्रत रवाना करण्यात आली आहे.