धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील धानोरा येथिल एकमेव राष्ट्रीयकृत सेंट्रल बँकेची कनेक्टिव्हिटी तब्बल दहा दिवसांपासुन बंदच आहे. यामुळे पंधरा खेड्यातील शेतकरी, खातेदार, व्यापारी यांचे अतोनात हाल होत आहे. या महीन्यात या बँकेत अनेक अडी-अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने सर्वच खातेदारांमध्ये नाराजी पसरली आहे.
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या राज्यमहामार्गाला लागुन सेंट्रल बँक ऑफ इंडीया ची शाखा आहे. ऑक्टोबर महीन्यात तब्बल दहा दिवसांपासुन कनेक्टिव्हिटी बंद आहे. काही दिवस रोखापाल आले नाहीत. तर काही दिवस रोकड नव्हती. यामुळे सर्वच खातेदारांध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. तब्बल पंधरा खेड्यातील खातेदार या राष्ट्रीयकृत बँकेला जोडले गेलेले आहेत. यामुळे दररोज येऊन बाहेरगावातील खातेदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक शेतक-यांनी पिक कर्ज साठी दोन महीन्यापांसुन फाईल दप्तरी जमा केली आहे. परंतु त्यांनाही कर्ज मिळत नाही आहे. तसेच कुठलेही कर्ज प्रकरण पास होत नाही तसेच नविन खाते उघडले जात नाही आहे. पिकविम्याचे पैसेही जमा झालेले असुन त्याची साधी नोंदही मिळत नसल्याने शेतकरी संतत्प झालेले आहेत. यामुळे या सर्व समस्यांकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
दरम्यान पाऊस, वीज कडाडल्याने इंटरनेट कनेक्टिव्हिटी चा पार्ट जळाला आहे. तो नाशिक येथुन मागवावा लागतो, यामुळे तो येताच बँकेची कामे सुरळीत होतील. कर्जफाईल ची कामे वरीष्ठ अधिकारी न आल्याने झालेली नाहीत. तेही येताच पिककर्ज वाटप करु अशी प्रतिक्रिया संदिप यादव (शाखाधिकारी) यांनी दिली आहे.