मुंबई (वृत्तसंस्था) बहुमत चाचणीच्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचे शिसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. १६ आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील विषय सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना बहुमत चाचणी घेणे बेकायदेशीर आहे. याविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहोत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
“१२ राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी अडीच वर्षांपासून प्रलंबित आहे. पण राज्यपाल याच क्षणाची वाट पाहात होते. आमच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ११ तारखेपर्यंत त्यावर निर्णय होणार नाही. यादरम्यान असं काही घडलं, तर सर्वोच्च न्यायालयाने दाद मागण्याची मुभा दिली आहे. अशात राजभवन आणि भाजपा मिळून संविधानाच्या चिंधड्या उडवत असेल, तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करावा लागेल. आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत”, असं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि राज्यपालांवर देखील टीका केली आहे.
दरम्यान, शिवसेनेचे आमदार फोडून भाजप राज्यातील सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, असं उपरोधिक भाष्यही राऊत यांनी केलं आहे. तसेच अडीच वर्षांपासून आम्ही एक फाईल पाठवली आहे. पण तुम्ही सरकार अस्थिर व्हायची वाट पाहात होतात. तुम्ही हे सरकार पडल्यानंतर किंवा पाडल्यानंतर कुणालातरी या १२ जागा गिफ्ट देणार आहात. पण आपल्या राज्यपालांवर देखील कुणाचातरी दबाव असू शकतो. त्यामुळे मी फार काही बोलणार नाही, असं देखील संजय राऊत म्हणाले.