अमळनेर (प्रतिनिधी) आज दुपारी वादळी वाऱ्यानंतर चिंचेचे झाड झोपडीवर कोसळून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील अंचलवाडी येथे घडली. ज्योती बल्लू बारेला (वय १६) आणि रोशनी बल्लू बारेला (वय १०) अशी या दुर्घटनेट मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत
ज्योती आणि रोशनी यांचे वडील बल्लू बारेला हे अमळनेर तालुक्यातील रणाईचे गावातील रहिवासी राजेंद्र भीमराव पाटील यांच्या शेतात सालदारकी करतात. बल्लू यांनी राहण्यासाठी अंचलवाडी गावाबाहेर खळ्यात चिंचेच्या झाडाजवळ झोपडी बांधलेली होती. रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक जोरात वादळ-वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. याचवेळी काही कळण्याच्या आत खळ्यात असलेले चिंचेचे झाड झोपडीवर कोसळले. त्यात ज्योती बारेला आणि रोशनी बारेला या दोन्ही बहिणी झाडाखाली दाबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा बारेला दाम्पत्य हे दररोजप्रमाणे शेतात कामाला गेलेले होते.