जळगाव (प्रतिनिधी) राज्यपाल कोट्यातून आमदारकीसाठी ज्या १२ लोकांची नियुक्ती रखडली असून राज्यपालांनी याबाबतचा निर्णय लवकर घेतला पाहिजे होता. नियुक्तीचा अधिकार त्यांना आहे. पण त्यांच्या डोक्यात काय आहे, तेच आम्हाला माहिती नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते तथा सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. अजिंठा शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीबाबत न्यायालयाने राज्यपालांच्या मुख्य सचिवांना विचारणा केली असून, त्याचे उत्तर दोन आठवड्यात मागितले आहे. आता ते न्यायालयाला काय उत्तर देतात, याची तुमच्याप्रमाणे मलाही उत्सुकता आहे. राज्यपाल नियुक्त आमदार करणे ही काही आजची गोष्ट नाही. ही बाब परंपरागत सुरू आहे. आमदार मग तो विधानसभेचा असो किंवा विधानपरिषदेचा, प्रत्येकाच्या डोक्यात विकासाच्या बाबतीतच नव्हे तर राज्याला सूचना देण्याच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारची कल्पना असते. त्यामुळे आमदारांच्या नियुक्तीला महत्त्व दिले पाहिजे. आपला देश विविध भाषा आणि प्रदेशात विभागला आहे. म्हणून कोणत्याही विधानसभा क्षेत्रात लोकप्रतिनिधींच्या जागा रिक्त राहणे लोकशाहीसाठी योग्य नाही, असेही ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.