जळगाव (प्रतिनिधी) राजकारणात आणि बुद्धीबळाच्या खेळात डावपेच हे सारखेच खेळावे लागतात. समोरच्याने जी चाल चालली किंवा जो प्यादा पुढे केला, त्याच पद्धतीने आपल्यालाही खेळ खेळावा लागतो. असाच काहीसा खेळ जळगावाच्या राजकारणात सुरु असल्याची चर्चा आहे. बीएचआरमधील १२०० कोटीच्या घोटाळ्याला प्रतिउत्तर म्हणून दुध जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादन संघातील ३ हजार कोटीचा घोटाळा, गिरीश महाजन यांच्या जमीन खरेदीवर एकनाथराव खडसे नावाच्या पतसंस्थेत ठेवीदारांचे अडकलेले पैसे किंवा ‘सागर पार्क’ची जमीन बळकावण्यासाठी १०० कोटीची सुपारी, असे आरोप-प्रत्यारोप होताय. थोडक्यात घोटाळ्याला घोटाळ्याने आणि बदनामीला बदनामीने प्रतिउत्तर दिले जातेय. म्हणून तर दोघांवर आरोप लावणाऱ्यांची संख्या अचानक वाढलेली दिसून येतेय. थोडक्यात नाथाभाऊ आणि गिरीशभाऊंमध्ये आता बुद्धिबळाप्रमाणे खेळ सुरु झालाय का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय सुनील झंवर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर बीएचआरच्या माध्यमातून गिरीश महाजन हे टार्गेट पॉइंट असल्याचे स्पष्ट होते. थोड्याच दिवसात या प्रकरणात बड्या नेत्याचे नाव असल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत करत सूचकरित्या गिरीशभाऊंकडे बोट केले होते. २०१८ पासून पाठपुरावा करत आहे. केंद्र शासनाकडून याची चौकशी करण्याचे आदेश असताना देखील त्यावेळी प्रकरण दडपण्यात आले. मात्र आता यातील सर्व सत्य बाहेर येणार असल्याचे खडसेंनी सांगितले होते.
खडसे यांच्या पत्रकार परिषदनंतर जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषद घेत गिरीश महाजन यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेला पुरावे दिल्याचे सांगितले होते. यात बीएचआरची एक जमीन पुणे येथील व्यक्तीने घेतली होती, नंतर तिच जमीन गिरीश महाजन आणि साधना महाजन यांच्या नावावर पलटी मारल्याचा खळबळजनक आरोप केला होता. यानंतर वरणगाव येथील एकनाथराव खडसे नावाच्या पतसंस्थेत ठेवी अडकले असल्याचे सांगत दोन ठेवीदारांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर आमदार राजूमामा भोळे यांनी देखील पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारकडून शहरातील सागर पार्कची जागा हडप करण्यासाठी १०० कोटीची सुपारी दिल्याचा आरोप केला.
राजूमामा यांच्या पत्रकार परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र शासन, पोलीस विभाग आणि न्यायालयाची परवानगी न घेता जळगाव जिल्हा सहकारी दुध संघाचे सन १९७५ ते २००० पर्यंतचे सर्व रेकॉर्ड विद्यमान चेअरमन मंदाताई खडसे यांच्या काळात जाळून टाकण्यात आले. तसेच कर्ज नसणाऱ्या दुध संघावर आज ६० कोटी पेक्षा अधिकचे कर्ज झालं आहे. एवढेच नव्हे, तर सन १९९५ पासून आतापर्यंत दुध संघात तब्बल ३ हजार कोटीचा घोटाळा झाला असल्याचा आरोप जिल्हा सहकारी संघाचे माजी सुरक्षा अधिकारी एन.जे. पाटील यांनी करून खळबळजनक उडवून दिली.
घोटाळ्याच्या उत्तरला त्यापेक्षा मोठ्या घोटाळ्याचा आरोप. ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवींवर अन्य पतसंस्थेतील ठेवी अडकल्याचा मुद्दा थोडक्यात खडसे आणि गिरीशभाऊंमध्ये बुद्धिबळाचा खेळ सुरु आहे का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. कारण अचानक दोघांविरुद्ध आरोप लावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हा निव्वळ योगा-योग कसा असू शकतो?. म्हणून तर बदनामीचे उत्तर त्याचपद्धतीच्या बदनामी दिले जातेय. हल्ल्यावर प्रतिहल्ला सुरु आहेतअसे बोलले जात आहे. एकनाथराव खडसे जेवढ्या आक्रमकतेने बीएचआर घोटाळ्यावर बोलताय. तेवढ्याच आक्रमकपद्धतीने गिरीश महाजन देखील आपल्या चाली चालत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एवढेच नव्हे तर, हा राजकीय बुद्धीबळाच्या या खेळात भविष्यात आणखी मोठ्या घडामोडी घडणार असल्याचेही बोलले जात आहे.