जळगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांची रब्बीसाठी पेहरणीची कामे सुरू असतांना शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन बिल भरलेले व बिल देखील वितरित न झालेल्या अनेकांची वीज कापण्यात आल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून येथील अभियंता व्ही. बी. पाटील यांना निवेदन दिले. यावेळी शेतकऱ्यांसह देवकरांनी अभियंत्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले.
वीज पुरवठा सुरळीत करा
शेतकरी रब्बी हंगामासाठी शेती तयार करण्यात व्यस्त आहेत. यात अनेक भागात रब्बीच्या पेहण्या देखील सुरू असल्याने या पिंकांसाठी शेतकरी रात्री पाणी भरत आहेत. मात्र, महावितरण शेतरकऱ्यांच्या मुळावर उठत शेतकऱ्यांकडे थकीत असलेल्या बिलांचे कारण पुढे करत थेट वीज कनेक्शन खंडित करत आहे. यात अनेकांनी ऑनलाइन बिल भरून वा वीज बिलेही वाटली गेली नसल्याने कोणतीही पूर्वसूचना न देता अशी वीज तोडणे गैर असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला. या वेळी धानवड, नांद्रा, चिंचोलीसह जळगाव ग्रामीणमधील विविध गावांतील शेतकऱ्यांनी अभियंत्यांना जाब विचारत धारेवर धरले. तसेच ज्या शेतकऱ्यांनी वीज बिल भरले असेल त्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा ताबडतोब सुरु करण्यात यावा. जे शेतकरी एक एक बिल भरणार असतील त्यांचा सुद्धा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा बँक चेअरमन गुलाबराव देवकर यांनी कार्यकरी अभियंता केली आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
शेतीपंपाला पुरेशा दाबान वीजपुरवठा करावा, रात्रीचे लोड शेडिंग बंद करावे, शेतीसाठी 8 ऐवजी 12 तास अखंडित वीजपुरवठा द्यावा, शेतीपंपाच्या वेळी वीज खंडित करून नये, वीज खंडितसाठी पूर्वसूचना द्यावी, रब्बी हंगामात वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांन वेठीस धरू नये. दरम्यान, कानळदा शिवारात 700 शेतीग्राहक आहेत. यात कानळदासह पिलखेडा, नंदगाव, नांद्रा, फेसर्डी, फुपनगरी, आव्हाणे आदी गावांतील तीनशेवर थकीत ग्राहकांकडील वीज कापण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला. यात अनेकांनी ऑनलाइन बिल देखील भरले होते. यावेळी याप्रसंगी जिल्हा युवक सरचिटणीस अनिल खडसे, शिवाजी धनगर, ज्ञानेश्वर मांडे, हर्षल राणे, समाधान पाटील, मुकुंदा पाटील, पोपट कोलते आदी शेतकरी उपस्थित होते.