नाशिक (वृत्तसंस्था) आमच्या काळात फोन टॅप झाले याबाबतचे कोणतेही पुरावे नाहीत. देशभरातील सर्व विरोधकांचे आता संजय राऊत (sanjay raut) नाव घेतील. ते भंपक विधाने करत आहेत. आरोप करतायत तर पुरावे द्या ना, असं सांगतानाच राऊत यांच्या जीभेला हाड उरले नाही, अशी टीका भाजप नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांनी केली. रश्मी शुक्लाप्रकरणी राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा काम करत आहेत. या चौकशीत काही पुरावे समोर आले तर त्या गोष्टीला अर्थ आहे, असंही ते म्हणाले. गिरीश महाजन नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.
राऊत यांना याआधी कोणी ओळखत नव्हते
नाशिकचं प्रभारीपद मिळाल्यानंतर गिरीश महाजन पहिल्यांदा नाशिकमध्ये आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना श्री. महाजन म्हणाले की, संजय राऊत यांच्या बोलण्याला काही किंमत नाही. ज्या वेळेस आमची सत्ता होती, तेव्हा संजय राऊत कुठे होते? राऊत यांना याआधी कोणी ओळखत नव्हते. मागच्या काही दिवसांपासून त्यांना लोक ओळखायला लागले, अशी खोचक टीका भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केली आहे.
शिवसेना आम्हाला सोडून गेली त्यात सर्वात मोठा पुढाकार संजय राऊत यांचा
शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेल्या फोन टॅपिंगच्या आरोपावर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना आम्हाला सोडून गेली त्यात सर्वात मोठा पुढाकार संजय राऊत यांचा होता. त्यानंतर त्यांना लोक ओळखायला लागले. सत्ताधाऱ्यांकडून राज्यपाल हटावची मागणी केली जात आहे. त्यावर त्यांनी टीका केली. राज्यपालांची नेमणूक काही शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या हातात नाही. आमच्या मना सारख करा नाहीतर राज्यपालांना हटवा अशी त्यांची भूमिका आहे. शासनाच्या, पोलीस खात्याच्या बदल्यांमध्येही हाच प्रकार सुरू आहे. मनासारखं करा नाही तर हटवा, हे धोरण राबवले जात आहे.
ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये
ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये ही आमची मागणी आहे. पण राज्य सरकार नाकर्ते आहे. या सरकारने कोर्टाला अहवाल पाठवला त्यावर सही, तारीखही नव्हती. मंत्रिमंडळाच्या बैठका घेतात आणि मुख्यमंत्र्यांनी सही पण केली नाही, असंही ते म्हणाले.
नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा
नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा ही आमची मागणी आहे. दाऊदच्या हस्तकाकडून नगण्य किमतीत त्यांनी प्रॉपर्टी घेतली आहे. हसीना पारकरला पैसे दिले आहेत. तरीही राज्यसरकार त्यांना देशभक्त म्हणत असेल तर काय बोलणार. मग संजय राठोड यांचा राजीनामा का घेतला? हे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. यांना जनाची मनाची काहीच राहिली नाही. कुठे बाळासाहेबांची शिवसेना आणि आज नवाब मलिक जिंदाबादच्या घोषणा देणारी शिवसेना. यापेक्षा शिवसेनेचे दुर्दैव काही नाही, अशी टीकाही त्यांनी केली.