जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपालिका क्षेत्र, मौजे कुसुंबे व मौजे नशिराबाद येथील अतिक्रमित घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तात्काळ कार्यवाही १५ दिवसांच्या आत करण्यात यावी. तसेच जिल्ह्यात केळीचा पिक विमा काढलेल्या उर्वरीत क्षेत्राची पडताळणी ऑगस्ट महिन्याच्या आत करण्यात यावी, असे असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिले.
अजिंठा शासकीय विश्रामगृहात झालेल्या विविध विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील या प्रकल्पांच्या प्रस्तावांची सद्यपरिस्थिती, प्रलंबित घरकुलांचा समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर सदरचा प्रश्न मार्गी लावण्याच्या संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, धरणगाव नगरपालिका हद्दीतील संजय नगर, नेहरूनगर व गौतम नगर येथील १७५४ अतिक्रमण घरांचा प्रश्न शासन निर्णयानुसार लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा. नशिराबाद येथील गट नंबर २३२० मधील अपूर्ण बांधकाम असलेल्या घरकुले व अतिक्रमित घरकुले नियमित करण्याचा प्रश्न तसेच कुसुंबा येथील गट नंबर २३०/२ व ३१५ मधील अतिक्रमण नियमित करण्यासाठी शक्ती प्रदत्त समितीने तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा.असे निर्देश ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.ठाकूर यांनी जिल्ह्यातील केळी पीक विम्याच्या सद्यस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात ८१ हजार ६४२ हेक्टर क्षेत्रासाठी ७७ हजार ९२० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यापैकी ४४ हजार ५२६ हेक्टर क्षेत्राची शेतकऱ्यांनी पडताळणी केली आहे. अद्याप ३७ हजार १०० हेक्टर क्षेत्राची पडताळणी बाकी आहे. यावर पालकमंत्री यांनी सूचना दिल्या की, उर्वरित क्षेत्राची तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या मदतीने पीक विमा कंपनीने तात्काळ पडताळणी करावी.
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे नियमानुकुल करतांना ग्राम विकास विभागाचा २०१८ च्या शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करावी. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून या जागेची मोजणी फी भरण्याची कार्यवाही करावी. अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी एम.पी.मगर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.संभाजी ठाकूर, जळगाव गटविकास अधिकारी कसोदे, जळगाव प्रांताधिकारी महेश सुधळकर, एरंडोल प्रांताधिकारी मनीष गायकवाड, तहसीलदार नामदेव पाटील, धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, धरणगाव मुख्याधिकारी विकास नवाडे, नशिराबाद मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला.या प्रसंगी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जि.प. चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, पी. एम. पाटील सर, नाशिराबादचे माजी सरपंच विकास पाटील, विकास धनगर, चेतन बरहाटे, ऍड भोलाणे, नरेंद्र सोनवणे, निलेश राजपूत, पंकज पाटील, सी. ए. हरिष आगीवाल, धनंजय सोनवणे यांच्यासह सरपंच, ग्रामविकास अधिकारी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.