श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी रात्रीपासून वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केलाय, तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडले आहे. पुलवामा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गांदरबल आणि हंदवाडा येथे प्रत्येकी एक दहशतवादी मारला गेला आहे. एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.
काश्मीरचे पोलीस अधिकारी विजय कुमार यांनी सांगितले की, पुलवामा येथे झालेल्या चकमकीत पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी मारले गेले. अद्यापही या परिसरात दोन दहशतवादी आहेत आणि भारतीय सैन्याची या दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. पुलवामाच्या चेवाकलां परिसरात शुक्रवारी सायंकाळी सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती.
हंदवाडा येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास रजवाडा क्षेत्रातील नेचामा येथे चकमक सुरू झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. या संदर्भात जम्मू-काश्मीर पोलिसांनी माहिती देताना सांगितले, गांदरबल येथे झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. गांदरबलच्या सेराच परिसरात अद्यापही चकमक सुरू आहे.
शुक्रवारी कुलगाम जिल्ह्यातील औडोरा परिसरात एका सरपंचाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या सरपंचाचे नाव शब्बीर अहमद मीर असे असल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारानंतर सरपंचाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. काश्मीर पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट केले की, गांदरबलच्या सेराच भागात चकमक सुरू झाली. पोलीस आणि सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. अद्यापही ही चकमक सुरू आहे.